“मी अहिल्याबाई होळकर बोलले वेशभूषा सादरीकरण
-दिघे वस्ती शाळेच्या चिमुकलीने साकारला इतिहास; अहिल्याबाईंचे विचार रंगमंचावर जिवंत
लोणी ज्ञानेश्वर साबळे इतिहासातील महान सेवाभावी कार्यकर्तृत्ववान ,न्यायनिष्ठ प्रशासन आणि लोककल्याणकारी धोरणांचा जिवंत आविष्कार रंगमंचावर घडवित राहुरी तालुक्यातील दिघे वस्ती शाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु. प्रियल प्रमोद दिघे हिने केंद्रस्तरीय वेशभूषा व व्यक्तिमत्त्व सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत प्राविण्य मिळविले. “मी अहिल्याबाई होळकर बोलते…” या प्रभावी विषयावर केलेल्या तिच्या सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थितांना मंत्रमुग्ध केले असून या यशामुळे शाळा, पालकवर्ग व संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र शाळेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या ऐतिहासिक व सामाजिक व्यक्तिमत्त्वांच्या भूमिका साकारत आपली कला सादर केली.
मात्र प्रियलने सादर केलेली अहिल्याबाई होळकरांची भूमिका ही केवळ अभिनय न राहता इतिहासाची सखोल जाण, मूल्याधिष्ठित विचार आणि समाजभान यांचे प्रभावी दर्शन घडविणारी ठरली.अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळातील न्यायप्रियता, प्रशासनातील पारदर्शकता,
स्त्रीसशक्तीकरणाचे विचार, धार्मिक सहिष्णुता तसेच मंदिर-जिर्णोद्धाराच्या कार्याचा संदर्भ देत प्रियलने आपले सादरीकरण अत्यंत आत्मविश्वासाने मांडले. स्पष्ट उच्चार, भावपूर्ण संवाद, समर्पक देहबोली आणि सुसंगत वेशभूषा यामुळे तिच्या अभिनयाला अधिकच धार मिळाली. विशेष म्हणजे इतक्या लहान वयात इतिहासातील एवढ्या व्यापक व्यक्तिमत्त्वाचे विचार प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचविण्याची क्षमता तिने दाखविली.
प्रियलच्या सादरीकरणात अहिल्याबाई होळकर या केवळ एका ऐतिहासिक व्यक्ती म्हणून नव्हे तर न्याय, करुणा व लोककल्याणाची जिवंत प्रतिमा म्हणून साकारल्या गेल्या. “राज्य म्हणजे प्रजेचे सुख” हा विचार तिने रंगमंचावर प्रभावीपणे मांडला. त्यामुळे परीक्षकांनी तिच्या सादरीकरणाची विशेष दखल घेत तिला प्रथम क्रमांकासह प्राविण्य घोषित केले.
या यशामागे दिघे वस्ती शाळेतील मुख्याध्यापक श्री.शिंदे, वर्गशिक्षिका सौ.पारेकर व सर्व शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन आणि परिश्रम मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विषयाची सखोल समज करून देणे, नियमित सराव घेणे, तसेच उच्चार, भाव, हावभाव व रंगमंचीय शिस्त यावर विशेष लक्ष देणे, या सर्व बाबींमुळेच प्रियलचे सादरीकरण अधिक प्रभावी झाले. शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि मार्गदर्शन याचेच हे फळ असल्याचे पालकांनीही नमूद केले.
प्रियलच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी तिचे मनापासून अभिनंदन केले. ग्रामीण भागातील शाळांमधूनही दर्जेदार गुणवत्ता घडू शकते, हे प्रियलच्या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धात्मक वृत्ती व आत्मविश्वास वाढला असून पुढील स्पर्धांसाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.कु.प्रियल दिघे हिच्या या उज्ज्वल यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही ती आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करेल, असा विश्वास शिक्षक, पालक व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.तिची ही कामगिरी निश्चितच ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
