अहिल्यानगर प्रतिनिधी तालुक्यातील विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय यास नुकतेच राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या मूल्यांकन प्रक्रियेत मानाचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन कार्य,विस्तार शिक्षण उपक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची ही उल्लेखनीय पोचपावती मानली जात आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद मान्यताप्राप्त तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षण,संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे महाविद्यालयाने कृषी शिक्षण क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मूल्यांकन समितीने महाविद्यालयातील शैक्षणिक,संशोधन, विस्तार शिक्षण, प्रशासकीय व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थी कल्याणविषयक उपक्रमांचे सखोल मूल्यमापन करून महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. हा दर्जा महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीचा आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.राऊत यांनी सांगितले.
या यशामागे संस्थेचे सचिव डॉ. पी.एम. गायकवाड, संचालक डॉ. अभिजित दिवटे तसेच तंत्र संचालक सुनील कल्हापुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मा.खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. भविष्यातही महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि कृषी क्षेत्रातील उत्कृष्टता कायम राखत नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. महाविद्यालय भविष्यातही कृषी शिक्षण,संशोधन आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांद्वारे कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
