श्रीरामपूर (दिपक कदम) पुन्हा एकदा निपाणी वडगावात भर वस्तीत बिबट्याने घुसून येथील शेळ्या बकरांचा फडशा पाडल्याने येथील कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे.
शहारालगत असणाऱ्या अशोकनगर मधील रेल्वे स्थानक या ठिकाणी ज्ञानदेव चंदर जगताप हे मोलमजुरीचे काम करतात.त्यांचे घराला विटा व जाळीचे ६ फूट कंपाउंड असलेल्या ठिकाणी १ गाभण शेळी व ३ बोकड अशी पशुधन घरासमोर बांधलेले होते.रात्री २ वाजेच्या दरम्यान त्यांच्या पत्नी सौ.कविता जगताप यांना बकऱ्या धावपळ करीत असल्याचा आवाज आला म्हणून त्या रात्री दोन वाजता उठून बकऱ्या जवळ आल्या असता त्यांना बकऱ्या घाबरलेल्या अवस्थेत दिसल्या परंतु त्यांनी ती गोष्ट मनावर न घेता बकऱ्यांना चारा दिला व नंतर झोपी गेल्या. रात्री सुमारे दोन ते साडे चारच्या दरम्यान बिबट्याने भिंत व जाळीचे असलेल्या कंपाउंड वरून घराच्या आवारात प्रवेश करून त्यांच्या ३ बोकड व १ गर्भार असलेल्या शेळीचा फडशा पडला.
पहाटेच्या दरम्यान कविता जगताप या शेळ्यांचे आवरण्यासाठी बाहेर निघाल्या असता त्यांना त्या शेळ्या मेलेल्या अवस्थेत आणि फाडलेल्या अवस्थेत दिसल्या.सर्व शेळ्या या अस्तव्यस्त पडलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीला उठविले पतीने येथे इतरत्र शोध घेतला असता त्यांना घराच्या आवारामध्ये बसवलेल्या फरशीवर बिबट्याच्या पायाचे रक्त लागलेले ठसे आढळून आले.बिबट्या हा घराच्या समोरील बाजूस असणाऱ्या शेती महामंडळाच्या मोकळ्या जमिनीमध्ये निघून गेला होता.
आवाजाने आसपासचे सर्व नागरिकांना जमा झाले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशीच एक घटना त्यांच्या शेजारी झाली होती. त्यावेळेस रामकुमार गायकवाड यांच्या तीन गाभण शेळ्या व पवार यांच्या सात शेळ्यांच्या बिबट्याने फडशा पाडला होता. हा बिबट्या शेळ्या मारण्यात सराईत झाला असून वेळोवेळी या ठिकाणी त्याचा वावर असल्याचे आढळून येते आहे.मागील पंधरा दिवसानंतर हा दुसरा हल्ला असून यामुळे पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या पशुधनावर गोर गरीब आपला उदरनिर्वाह करत असून होणाऱ्या नुकसानीस त्यांना सामोरे जावे लागत आहे. व त्यांच्या तोंडाशी आलेला घास त्यांना गमवावा लागत आहे.गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे ही गोष्ट नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिली असून देखील वनविभागाने अद्याप पर्यंत कुठलीच योग्य ती कारवाई केलेली नाही.आणि अनेकवेळा नागरिकांमधून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची विनंती केली आहे.परंतु अजूनही वनविभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात आलेले नाही.गेल्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी १३ पिंजऱ्याला मंजुरी मिळाली आहे असे आमदार हेमंत ओगले यांनी सांगितले होते.त्या पिंजऱ्याचे झाले काय ? वनखाते त्यासाठी असमर्थ आहे काय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नागरिकांना अद्याप पर्यंत मिळालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला जात आहे. वेळोवेळी घडणाऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.परिसरातील अनेक नागरिक येथे बिबट्याच्या नेहमीच्या मुक्त संचारामुळे दहशती खाली वावरत आहेत. बिबट्याच्या वेळोवेळी होणाऱ्या हल्ल्यावर त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी शासनाने योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी यासाठी निपाणी वडगाव रेल्वे स्थानक परिसरातील सर्व नागरिक लवकरच आमदार हेमंत ओगले यांची भेट घेणार आहे.
निपाणी वडगाव परिसरात बरेच दिवसापासून अनेक बिबट्यांचा वावर असून प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी. या बिबट्यामुळे मानवावरील हल्ले सुद्धा वाढू शकतात अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सर्वप्रथम घटनेची माहिती प्रशांतराजे शिंदे यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी त्वरित भेट देऊन निपाणी वडगावचे सरपंच सौ.देवकर यांना घटनेची माहिती फोन वरून कळवली.सरपंच यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वनाधिकाऱ्यांना व सरकारी डॉक्टर यांना फोनवरून घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्यास सांगितले. या पशुधनावर सदर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो या पशुधनाची किंमत सुमारे साठ हजार रुपये इतकी असून ते गेल्यामुळे त्या कुटुंबामध्ये अतिशय दुःखद वातावरण पसरले आहे. वेळोवेळी बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई त्वरित करणे गरजेचे आहे. घटनास्थळी पंचाययात समितीचे विस्तार अधिकारी अशोक बोरुडे,ग्रामपंचायत सदस्य अलका म्हैसमाळे,जालिंदर उंडे, रविंद्र अंकुश सह परिसरातील सर्व अनेक भयभीत नागरिक जमा होऊन संताप व्यक्त करीत होते.