शिर्डी प्रतिनीधी – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिना झाल्यानंतर पालकमंत्र्यांची निवड झाली आहे. आपेक्षेप्रमाणे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील गुंडगिरी, वाळू माफिया, राख माफिया, पीकविमा माफिया असे विविध आरोप परळी आणि बीड जिल्ह्यातील नेतृत्व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डीमध्ये होत आहे. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडे शिर्डीत पोहचले. यावेळी त्यांनी भाषणही केले. तर पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी अजित पवारांनी पक्षाची पुढील रणनीती कशी असेल याचे सुतोवाच केले तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना पक्षात थारा दिला जाणार नाही. पक्षाला कमीपणा यायला नको. जनमाणसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. चुकीचं काम करणाऱ्याची हकालपट्टी केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय देत त्यांचे मंत्रिपद वाचवले. मात्र त्यानंतरही विरोधक आग्रकम आहेत. आजच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली. वाल्मिक कराडसोबत कोणतेही आर्थिक संबंध नाही, असा दावाही मुंडेंनी केला.
मला टार्गेट करुन अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे, असे सांगत त्यांनी बीडमधील गु्न्हेगारीशी काही संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी त्यांच्याविरोधात उठलेले वादळ आजच्या भाषणाने शांत केले असे म्हणत त्यांचे कौतूकही केले.