नाशिक दिनकर गायकवाड कांद्यास मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला असून या पार्श्वभूमीवर आज विंचूर येथील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यांसदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी सांगितले की,सलग पाच महिन्यांपासून उन्हाळी कांद्याला कमी भाव मिळत असून, त्यातच आता रांगड्या कांद्याला अवघा दीडशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटलने दर मिळत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव उत्पादन खर्चही भागवू शकत नाहीत, अशा
स्थितीत शेतकऱ्यांचा अखेर संयम सुटला आहे.
मे-जून महिन्यापासून कांदा साठवून ठेवलेला असून, बाजारात दर केवळ ६ ते ८ रुपये प्रतिकिलोच्या घरातच थांबले आहेत. त्यामुळे साठवणूक, मजुरी, वाहतूक अशा सर्व खर्चानंतर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने कांदा
दरवाढ रोखण्यासाठी निर्यात बंदी, साठा मर्यादा यांसारखे निर्णय घेतल्याने बाजारपेठ कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी विंचूर येथील छ. संभाजीनगर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात परिसरातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते
संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील, पंकज घोटेकर,अनिल घोटेकर,रामदास गवळी, भाऊसाहेब तासकर, समाधान घोटेकर, मंगेश घोटेकर, विनायक घोटेकर, पप्पू घोटेकर, नामदेव घोटेकर यांनी केले आहे.
निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यातबंदी उठवावी आणि बाजार हस्तक्षेप योजना तात्काळ राबवावी, अशा मागण्या केल्या. जर सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन केवळ विंचूरपुरते मर्यादित राहणार नाही तर राज्यभर तीव्र स्वरूप धारण करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी दिला आहे.
