मराठी माणसांच्या दुःखाचे मुळ अज्ञान.

Cityline Media
0
मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे..

-कमी प्रवास मुशाफिरी केल्याने जग कळते जाणीवा प्रगल्भ होत कल्पना सुचतात,मार्ग सापडतात व प्रगती होते.मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूसांचा प्रतिसाद मंदावला आहे.

-अति राजकारण सर्वात जास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे.राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो.यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष.
-दोनच हात कमावणारे सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे.

-सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला

कुटुंबात एकी नसते.बाप एका दिशेला,मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.

-खोटं बोल पण रेटून बोल
सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी,खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते.मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते,पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत.

-आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष

आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, थातुरमातुर उपचार केले जातात.योग्य आहार नाही, व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. भरपूर पैसा व्यसनातच संपतो.

-आर्थिक निरक्षरता पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट,डिमॅट,फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते.

-दूरदृष्टीचा अभाव पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात.

-ऐतिहासिक स्वप्नात
अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. जास्ती जास्त वेळ सोशल मीडियावर कोणी कधी काय केले ते शोधत फिरतो,आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो, तेव्हा सत्य आणि सध्याच्या परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे.

-गृहकलह, कोर्टकचेरी–
गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.

-समाज अर्थपुरवठा पद्धत 

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, मारवाडी, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही.

आता तर सरकार ने नवीन व्यावसायिकांसाठी ५ लाखांपर्यंत कर्जयोजना सूरु केली आहे, ज्यात बिना गॅरंटी कर्ज उपलब्ध आहे,पण त्याबद्दल काहीच माहिती करून घेत नाहीत.

-जनरेशन गॅप खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही.

-ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट
प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे.काहीही करून पदवी मिळवायची.त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार, व बाहेरून आलेला प्लंबर,गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो.

-धरसोड वृत्ती हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी, कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती…हे काम केले तर लोकं काय म्हणतील? अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.

-कष्टाची लाज

विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. इझी मनीचे खुळ डोक्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरातही कामं करण्यास लाजं वाटते.

-फालतू बाबींना महत्व
एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले,लग्नात आहेर नाही केला, होर्डिंगवर नाव नाही ही टाकले,अशा जुजबी बाबींमध्ये अडकून पडला आहे. दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद
भावाचा ऊस जळाला,त्याला पाण्याची नाही दिली,त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात मित्रांचे व्यवसायात नुकसान झाले, बरं झालं मी आधीच सांगत होतो नको करू, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे 'आश्चर्य' मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहेत!

इंग्रजी कच्चे–मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे,लिहिणे,वाचणे आलेच पाहिजे.अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून इंग्रजीवर राग दाखवून काही होणार नाही.

-संवाद कौशल्याचा अभ्यास
जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे,काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.

-चाकोरी मोडत नाही

अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी – पंचायत – ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.

-जाती प्रथा –

(अतार्किक प्रथा) २१व्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म – पंथ – जात – पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही. आणि याचा फायदा इतरांना होतो.
अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला; स्वतःची  एक व्यक्ती म्हणून दमडीची अचीव्हमेंट नसताना; चक्क अभिमान वाटतो.

वेळेची किंमत

वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.

ग्राहकाला किंमत न देणे

ग्राहक म्हणजे राजा समजला जातो पण अपल्याकडे तसे होत नाही, ग्राहकाला समोर रुबाब दाखवणे,तसेच ऐन कामाच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवणे आणि ग्राहकाला दिलेलं वेळ न पाळणे, १० ची वेळ सांगून ११ ला पोचणे, याने ग्राहक सुद्धा निसटतो.आणि आपला रेफरन्स पुढे कोणाला देत नाही.

पत्रकार सोमनाथ डोळे
झरेकाठी ता.संगमनेर फोन-९७६३५१२०९१
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!