दर्शन रांगेत मृत्यू झाल्यास एक लाखाची आर्थिक मदत
पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर,विठ्ठल मंदिरात दरवर्षी असंख्य लोक दर्शनासाठी येतात,महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या इतर राज्यातील भक्त परिवार देखील पंढरपूरात दाखल होतो.आषाढी एकादशीत आणि इतर दिवशी देखील येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते,या गर्दीमुळे भाविकांना तासनतास तिष्ठेत राहावे लागते,त्यात आता मंदिर समितीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे.
त्यातल्या एका नव्या निर्णयानुसार नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला तात्काळ थेट दर्शन मिळणार आहे,त्यांना विनाअडथळा पांडूरगाचे दर्शन होणार आहे.त्यांना आता रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही.महाराष्ट्रातील अनेक नवविवाहित भाविक लग्न झाल्यानंतर पांडूरंगाच्या दर्शनासाठी येत असतात,मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवविवाहित दांपत्याला तासनतास तिष्ठेत उभे राहावे लागते.आता या नवीन निर्णयानुसार त्यांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांना थेट तात्काळ दर्शन होणार आहे.नुकत्याच मंदिर समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध,अपंग,दिव्यांग आणि चालता न येणारे वृद्ध यांना देखील झटपट दर्शन दिले जाणार आहे.यासाठी व्हिलचेअरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.यावेळी विठुरायाच्या दर्शन रांगेत जर मृत्यू झाला तर त्या भाविकांना मंदिर समितीकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे व तो मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही मंदिर समिती उचलणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.