आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील खळी कांगणवाडी येथे एका अत्यंत दुःखद घटनेत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला. अंघोळीसाठी गरम पाणी अंगावर सांडल्याने दोघेही गंभीररित्या भाजले होते. उपचारादरम्यान दोघांनीही प्राण गमावल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
खळी कांगणवाडी येथील रहिवासी कै. सिंधुबाई नामदेव सोसे (५२ वर्षे) आणि त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे (५ वर्षे) यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. ८ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास अंघोळीसाठी गरम पाणी त्यांच्या अंगावर सांडले. या अपघातात दोघेही जवळपास ६० टक्के भाजले, विशेषतः पाठीचा मागील भाग आणि पाय जास्त प्रभावित झाले. त्यांना तात्काळ प्रवरा ग्रामिण रुग्णालय, लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
काही दिवस प्राणज्योत राखण्यासाठी दोघांनीही संघर्ष केला. मात्र १५ सप्टेंबर रोजी आजी सिंधुबाई सोसे यांचा मृत्यू झाला, तर मंगळवार (२३ सप्टेंबर) नातू राहुल प्रकाश सोसे याचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोसे कुटुंबावर आणि खळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिंधुबाई सोसे यांच्या पश्चात पती नामदेव सोसे, मुलगा प्रकाश सोसे, योगेश सोसे, दोन सुना, दोन मुली, जावई आणि नातवंडे, तर नातूच्या पश्चात एक छोटी बहीण गौरी व आई-वडील असा परिवार उरला आहे.
सोसे कुटुंबीय अत्यंत साधे, कष्टकरी आणि मनमिळाऊ म्हणून ओळखले जातात. या कठीण काळात कांगणवाडीतील सर्व ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला आणि कुटुंबाला धीर दिला, हे आजच्या काळातील माणुसकी जिवंत आहे याचा अनुभव देणारे आहे.
या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि पाहुणे मंडळी हळहळले असून, सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
