खुज्या राजकीय व्यवस्थेकडून लोककल्याणाचा बळी.
सह्याद्रीच्या कुशीतुन उगम पावलेली प्रवरानदी पुढे,पुढे शेतकऱ्यांसाठी जिवनदायनी ठरली आणि कृषीन्नोती ठरलेला प्रवरा काठ बहरला येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य आणि समाधान दिसू लागले खऱ्या अर्थाने येथूनच लोककल्याणला आरंभ झाला.
अठराव्या शतकाच्या अखेरीला अन् एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्याच दशकात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या मातीत सह्याद्रीच्या कुशीत प्रवरा नदीचे पाणी अडवून विल्सन धरण बांधले.भंडारदरा धरण म्हणुन प्रसिद्धीस पावलेल्या या धरणावर पाटपाण्याचे कालवे नसल्याने त्याचा प्रत्यक्षात वापरच नव्हता.हि बाब हेरून अगदीं याच काळात एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात अखेरीला तत्कालीन ब्रिटिश शासनाकडे मूळच्या कोपरगाव तालुक्यात ब्रिटिश उद्योजकांकदून साखर निर्मितीच्या कारखान्याचा प्रस्ताव आला.या प्रकल्पात तयार होणार असलेली साखर मात्र समुद्रमार्गाने थेट इंग्लंडला घेवुन जाण्याची योजना आखली गेली होती, त्यामुळे हजारो एकर जमीन संपादित करून उद्योजकांना देण्यात आली.या सर्व जमीनीवर ऊस पिकाची लागवड उभी करण्याची आणि त्यातूनच प्रक्रियेद्वारे साखर तयार करायची योजना अंमलात आणण्यासाठी आता मुबलक पाण्याची देखील गरज होती याशिवाय गत्यंतर नव्हतेच.
आपली पाण्याची गरज भागण्यासाठी मग ब्रिटिश उद्योजकांनी तत्कालीन शासनाकडे या भंडारदरा धरणाच्या बारमाही पाण्याची मागणी केली आणि मागणी तत्काळ मंजूर करण्यात आली.आता मंजुर केल्याप्रमाणे पाणी पुरवणे शक्य व्हावे म्हणूनच योजना आखली गेली.प्रवरा नदीचे भंडारदऱ्यात साठवलेले हे पाणी प्रवाहित करून संगमनेरात पुढे ओझरला अडवून याच पाण्याला दिशा देण्यात आली.हे आणलेले पाणी वळवून कालव्याने नवीन बांधलेल्या पाटामधून थेट तेव्हाच्या त्या उंदिरगाव शिवारातील प्रकल्पाच्या जागेवर पोचविण्याची योजना सफल झाली.पाण्याच्या या साऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाहाच्या दोनही बाजुला असलेल्या संगमनेर आताच्या लोणी आणि आताच्याच श्रीरामपुर तालुक्यातील शेतजमिनीला जाग्यावर पाणी उपलब्ध झाले आणि म्हणूनच शेतमळे बहरले.
१९२० सालात तत्कालीन ब्रिटिश वंशाच्या उद्योजकांच्या दूरदृष्टीतून आरंभ झालेला प्रवरेच्या पाण्याचा हा जीवनप्रवास अनुभवायचे मनोमन निश्चितच केलेले होते. याचंच पुढचं पाऊल म्हणुन आजपासून मागे बरोबर चार वर्षांपूर्वी सोबतीला आलेल्या दोन मित्रांच्या साथीने थेट ओझर बंधाऱ्यावर जाऊन थडकलो तेंव्हा मी ब्रिटिशांच्या त्या कार्यकर्तृत्वाचा टिपलेला हाच तो मोठा प्रेरणास्रोत आहे की जो अजूनही मजबुत,निश्चल अन् सौंदर्यमिश्रित वास्तुकलेचा जणू दीपस्तंभच ठरावा..!
#टीप - सन १९२० सालात नंतर हरिगाव या नावाने जाहीर केलेल्या गावात ब्रिटिश उद्योजकांनी हा पहिलाच साखर कारखाना उभारला पुढें अन् १९५८ पर्यंत त्यांनीच प्रकल्प यशस्वीपणे चालविला नंतरच्या काळात त्यांनी हा देश सोडताना भारतीय वंशाच्या उद्योजकांकडे हस्तांतरीत केला या पुढच्या काळात देखील सुरळीत यशस्वीरीत्या सुरू असलेल्या या गोड साखर उद्योगाने संपुर्ण देशाला साखर निर्मितीचे धडे दिले.साखरेसाठीचा उत्कृष्ठ ऊस पिकवायचा कसा यावर प्रयोग आणि संशोधन याच मातीत झाले.ब्रिटिश उद्योजकांनी कामगारांसाठी इथेच सहकार सोसायटीची स्वतंत्र इमारत सुध्दा बांधून ती कार्यान्वित केलेली होती.कामगारांच्या प्रपंचासाठीच्या जीवनावश्यक वस्तू येथूनच पुरवल्या जात असत.
अगदी याच काळात ध्येयवेड्या अभ्यासू विद्वान मंडळींनी इथे वारंवार भेटी देत दीं बेलापूर शुगर कंपनी हा ऊस बेणे संशोधन ते निवड ते लागवड ते पिकवणे ते गोड साखर तयार करणे शिवाय या साखरेची साठवणूक ते जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेची विक्री करणे हि सारी प्रक्रिया समजून घेण्यात गुंतवून घेतले अन् पुढे जनमानसांत जाऊन ही शेतकरी सन्मानाची चळवळ रुजविण्याचे प्रयोग यशस्वी करून दाखवले.
पण दूसरीकडे..?
हा साखर निर्मितीचा यशस्वी कारखाना इथल्याच खुज्या राजकीय मानसिक प्रवृत्तींच्या मनात भरला.मग पुढे सुरू झालेल्या नियोजित षडयंत्राने राजकीय साठमारीत संपूर्ण देशाभरात एकमेव असा आदर्शवत असणारा या बेलापूर शुगर साखर फ्याक्टरी प्रकल्पाचा.कामगारांच्या प्रपंचाचा, त्यांच्या लेकरांच्या वर्तमान आणि भवितव्याचा नाहक बळी घेतला गेला.
प्रवरामाई या जीवनदायिनीने मोठया कष्टाने दूरपर्यंत वाहुन आणलेले जीवनचैतन्य इथंच शिंपडून जनप्रवाहित केले होते.या परिसराचा इथे नांदलेल्या तेव्हाच्या त्या प्रगतीचा अन् उत्कर्षाचा ज्या कुणी बळी घेवुन सत्नियानाश केला त्याला सर्ग कधी माफ तरी करेल काय..?
पत्रकार सुनिल शिरसाठ
श्रीरामपूर-९८८११६६५१५