जमीन चोरी झाल्याचा दावा करत चंद्रकांत गावंडे यांचे तहसीलदारांना तक्रार निवेदन
अकोले (प्नतिनिधी) तालुक्यातील धामणगाव आवारी येथील घोरपडवाडी शिवारातील आदिवासी समाजातील जमीन मालक चंद्रभान रामभाऊ गावंडे यांची शेतजमीन सातबारावरून गायब झाली. ही जमीन नेमकी चोरीस गेली की,अचानक गायब झाली,याबाबत भूमीपूत्र चंद्रभान गावंडे हे अद्याप अनभिज्ञ आहेत. स्वतःच्या नावा वरील सर्हे नंबर १३ सात बारा उताऱ्यावरील वडिलोपार्जित जमीन तलाठी कार्यालयातून अशी गायब होण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे धामणगाव आवारी गावकऱ्यांत खळबळ उडाली.आपली वर्षोनूवर्ष वडिलोपार्जित जमीन शोधून ती आपल्याला मिळवून द्यावी, याबाबत चंद्रभान गावंडे यानी धामणगाव आवारी गावचे तलाठी व अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याकडे धाव घेतली.
धामणगाव आवारी येथील घोरपडवाडी शिवारातील शेतकरी रामभाऊ गावंडे यांनी १० मार्च रोजी अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याकडे यासंदर्भात विनंती अर्ज दाखल करून दाद मागितली. याबाबतीत त्यांचे म्हणणे आहे की,धामणगाव आवारी शिवारातील सर्हे नंबर १३ मधील २/१ ही वडिलोपार्जित जमीन मला मिळाली आहे.या जमिनीची मी मशागत करून त्यात पिके घेतो.
माझ्या वडिलांच्या निधनानंतर ही जमीन माझ्याकडे वंशपरंपरागत वारसा हक्काने आली.आजही या जमिनीचा मालक मिच असून ती माझ्याच ताब्यात आहे. ही जमीन मी नियमित कसतो व माझ्या कुटुंबीयांची हिच जमीन उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. मात्र,नुकतेच शासकीय कामानिमित्त मी धामणगाव आवारी गावचे तलाठी कार्यालयात गेल्यावर या जमिनीचा सातबारा उतारा मिळावा म्हणून मागणी केली.
तेव्हा गावी सव्हें नंबर १३ मधील २/१ व अशी कोणतीच जमीन तुमच्या नावावर दिसत नाही, असे उत्तर दिले.यामुळे माझ्याच जमिनीच्या सातबारावर उताऱ्यावर माझ्या मालकीच्या जमिनीवरील नाव कसे काय गायब झाले,ते मला समजत नाही.माझ्या अपरोक्ष माझ्या वडिलोपार्जित जमिनीपासून मला दूर करून माझी जमीन कोणी चोरी केली? याचा शोध घेऊन माझी वडीलोपार्जित जमीन सापडून सातबारा उताऱ्यावर पूर्वीप्रमाणेच माझे नाव दाखल करावे,अशी मागणी गावंडे यांनी तहसीलदार यांच्याकडे ११ मार्च रोजी केली. मात्र आतापर्यंत गावंडे यांना याबाबत महसूल विभागाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.या प्रकरणाची तालुक्यात चर्चा आहे.तर धामणगाव आवारीचे तलाठी संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.