संस्कार आणि नम्रता
वैद्यक शास्त्रात देव किंवा देवाच्या तत्त्वज्ञानाशी संबंधित असणे किंवा वैद्यकीय प्रक्रियेत देवांचे मार्गदर्शन किंवा शक्ती मानणे असा अर्थ अभिप्रेत असला तरी श्रीरामपुरात बालकांचे देवदूत बनलेले डॉ.कुमार चोथांनी यांचे वैद्यकीय कार्य जनसामान्य लोकांना देवता स्वरूप भासते.
आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार आपत्यांना नम्रता शिकवतात आणि तिच नम्रता, लीनता त्यांना देवत्वाचा रांगेत बसविते कारण ते दु:खिताचे संपुर्ण मानसिक समाधान करतात,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीरामपुरातील ऋषीतुल्य डॉ. कुमार चोथानी.वैद्यकीय ज्ञानाबरोबरच रुग्णांप्रती त्यांची असलेली आत्मीयता त्यांना 'बालकांचे दैवत्व' बहाल करते.
केवळ श्रीरामपूर तालुका नव्हे नगर जिल्हा नगर नव्हे तर महाराष्ट्रातून लोक बालकांच्या उपचारासाठी सरांकडे येतात. वय परत्वे कामाचा भार सहन होत नसताना देखील दिवसा काठी ८० ते १०० रुग्ण त्यांना तपासावे लागतात. त्यातच हर एकाचे मानसिक समाधान होत असते.इतकी प्रसिद्धी,पैसा मिळाल्यानंतरही या माणसाची लीनता जरा देखील कमी झालेली नाही.
'रंगलहरी'च्या प्रत्येक उपक्रमात ते आवर्जून हजेरी लावतात. नुकत्याच झालेल्या 'रंगरेषा मदतीच्या' उपक्रमात देखील त्यांनी अर्क चित्र काढून घेत आर्थिक मदतही केली.प्रत्येक भेटीमध्ये आमचे गुरु भरतकुमार उदावंत यांना घरी येण्याचे निमंत्रण देतात.त्यामुळे नुकतीच गुरुंनी सरांच्या निवासस्थानी भेट दिली.प्रसंगी समवेत डॉ.अबक,सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते व मी चित्रकार रवी भागवत देखील होतो.
सरांशी गप्पा मारताना वागण्यातील ही नम्रता त्यांना त्यांच्या वडिलांच्या संस्कारातून मिळाल्याचे समजले.त्यांच्या बालपणी वडिलांवर आर्थिक संकट आले.नातेवाईक, मित्रांकडून पैसे उसने घेतले मात्र बराच मोठा कालखंड उलटूनही परिस्थितीमुळे ते परत करू शकले नाही.
कालांतराने शिक्षण झाल्यानंतर सरांनी वैद्यकीय सेवा सुरू केली आणि आर्थिक परिस्थिती सुधारली.त्यानंतर वडिलांनी त्यांना देणेकरांची यादी दिली व सर्वांचे पैसे चुकते करण्यासाठी सांगितले.त्यातील अनेक जण हयात देखील नव्हते तर काहींना आपण पैसे दिल्याची आठवण देखील नव्हते.तरीही नम्रता व प्रामाणिकपणा जपण्यासाठी वडिलांनी उचललेले हे पाऊल आजही प्रेरणादायी असल्याचे चोथानी सर सांगतात.त्यांच्या तोंडून अशी अनेक उदाहरणे ऐकल्यानंतर लक्षात आले की मनुष्याच्या अंगी असलेली लिनता, प्रामाणिकपणा, सुस्वभाव या सर्वांचे मूळ हे मुलगामी संस्कारात दडलेले असते.ते उफाळून येतात मानवशक्ती जागृत होते,पालक जे वागतात बोलतात आणि शिकवतात त्यातूनच पुढील पिढीमध्ये 'गुण' पाझरत असतात.
-रवी भागवत,चित्रकार
श्रीरामपूर
