गावातील झुंडशाही संपविण्यासाठी माजी सैनिकांनी पुढे यावे

Cityline Media
0
प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे
 प्रतिपादन 
 देवळाली प्रवरा बनु इच्छिते बीड परळी ढूस यांचा दावा 
-देवळाली प्रवरेत वाल्मीक कराड प्रवृत्ती बळावतेय

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
परकीय आक्रमणापासून देशाच्या सीमेचे रक्षण करणेसाठी देश सेवेस स्वतःला वाहून घेतलेल्या माजी सैनिकांनी आता  गावातील झुंडशाही संपविण्यासाठी समोर येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी नुकतेच येथे केले.
देवळाली प्रवरा येथील सुभेदार भाऊसाहेब विट्ठल मुसमाडे यांच्या सेवा पूर्ती सोहळ्याचे निमित्ताने आयोजीत भव्य अशा कार्यक्रम प्रसंगी ढूस बोलत होते.

मिरवणुकीनंतर श्रीरामपूर रस्त्यावरील मुसमाडे वस्ती येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी देवळाली प्रवरा व पंचक्रोशीतील माजी सैनिक व भाऊसाहेब मुसमाडे यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी पुढे बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, आपल्या सेवा कालावधीत आपण देशाच्या सिमेचे रक्षण केले त्याबद्दल आपले हार्दिक आभार पण आता आपल्याला गावाचे रक्षण करणे गरजेचे आहे. गावाच्या विकासात योगदान देणे गरजेचे आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर गावावर आलेल्या माजी सैनिकांनी राजकारणात दुसरी इनिंग न अजमवता केवळ ग्राम विकास यांचेवर लक्ष केंद्रित करावे.

आजही माझ्या देवळाली प्रवरा शहराला बसस्थानक नाहीं..पोलिस ठाणे नाही क्रिडांगण नाही, ग्रामीण रुग्णालय नाही,एखादी दर्जेदार शिक्षण संस्था तर येथील नेते मंडळीनी उभी केली नाहीच सगळेच स्वहितार्थ मश्गुल,साधा एखादा उद्योग या गावात आणुन येथील तरुणाईला रोजगार दिला नाही त्यामुळे येथील तरुण भरकटतोय.
   
परिणामी गावातील बेरोजगार तरुणाईचा गैरफायदा घेवुन काही बालीश मंडळी गाव अस्थिर करीत आहेत गावातील तरुणांना चिथावणी देवून एक प्रकारे दरोडेखोर आणि दहशतवादी बनविण्याचे प्रशिक्षण येथे दिले जात आहे  पालकांनो आपण वेळीच जागे व्हा,आपले मुले सांभाळा हे आम्हीं यापूर्वीही अनेकवेळा सांगीतले आहे तरीही या  तरुणांना हाताशी धरून रात्री अपरात्री विरोधकांच्या घरावर हल्ले घडवून आणले जात आहेत  ‌ हे फार दुर्दैवी आहे हे भयाण वास्तव आपण सर्वांना मान्यच करावे लागेल. 
   
माझ्या घरावर मध्यरात्री भ्याड हल्ला करून मला व माझ्या कुटुंबाचा जाळून मारण्याचा प्रयत्न झाला त्या धक्याने आमची आई दगावली,नुकताच गावातील आदिवासी कुटुंबाच्या घरावर रात्री हल्ला करून दरोडा टाकण्यात आला त्यात महिलांची आणि लहान मुलींची छेड काढली गेली अश्या आणखी अनेक घटना आहेत,ज्यात गुन्हे दाखल नसल्याने त्या समोर येवू शकल्या नाहीत. परंतु या दोन घटनेतील काही गुन्हेगार एकच असल्याने त्यांचेवर संघटित गुन्हेगारी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई गरजेची आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र  येण्याची गरज आहे. 
   
आम्ही देवळालीची परळी होऊ देणार नाही हे यापूर्वीच सांगितलेले आहे कारण वाल्मिक कराड ने जे जे उद्योग केलेत तिच  प्रवृत्ती इथे वेगवान होत आहे मग ते जमीन बळकावणे असेल खंडणी असेल व्याजाचा धंदा असेल, मटका पेढी असेल गावात चोऱ्या करने असेल त्यामुळे माझ्या गावात जन्मलेल्या या वाल्मिक कराडला सर्वप्रथम गावातून हकलावे लागेल नाहीतर देवळालीची परळी व्हायला वेळ लागणार नाही.

या मंडळींची गावातील ही गुंडगिरी आणि झुंडशाही थांबविण्यासाठी आणि गावातून यांना हद्दपार करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी देवळाली प्रवरा शहरातील सर्व माजी सैनिकांनी पुढे येण्याची गरज आहे असे श्री ढूस म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की आम्हाला खात्री आहे की,ज्या पद्धतीने येथील माजी सैनिक गावच्या भल्यासाठी सातत्याने अग्रेसर राहिला आहे.त्या पध्दतीने गावगुंडांना हद्दपार करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व माजी सैनिक आमच्या सोबत येतील याचा विस्वास आम्हाला असल्याचे शेवटी ढूस यांनी बोलताना सांगितले व सुभेदार भाऊसाहेब विट्ठल मुसमाडे यांच्या भावी जीवनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने शुभेछा दिल्या.
 
प्रसंगी राज्यात विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केलेले वैभव ढूस लिखीत अंतः आस्ती प्रारंभ हे पुस्तक भेट देऊन सुभेदार  भाऊसाहेब विट्ठल मुसमाडे यांचा ढूस परिवाराचे वतीने सन्मान करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!