जनकल्याण फाउंडेशनचे पुरस्कार वितरण
नेवासा (दिपक कदम) ग्रामीण भागातील लोक गुण्यागोविंदाने विविध कार्यक्रम,उपक्रम आणि सन उत्सव एकत्रपणे साजरे करीत होते,परंतु अलीकडच्या काळात मतांच्या राजकारणासाठी काही शक्तींकडून घडवून आणल्या जात असलेल्या विविध घटनांमुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होत आहे. हे थांबवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामीण जीवन समृद्ध करण्याचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲड कॉम्रेड सुभाष लांडे पाटील यांनी व्यक्त केले.
जनकल्याण फाउंडेशन गोंडेगावच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड बाबा आरगडे,शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, ॲड बन्सी सातपुते,शाहीर भारत गाडेकर,प्रा. डॉ.अशोक कानडे,शाहीर सखाराम महापुरे, कॉ.आप्पासाहेब वाबळे,हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले,जन कल्याणचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कॉ. सुभाष लांडे म्हणाले की,गावचे गावपण टिकून ठेवण्यासाठी सामाजिक सलोखा राखण्याचे काम अशा कार्यक्रमामधून होत आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तव्य भावनेने समर्पित होवून काम करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा आदर सत्कार, गौरव करण्याचे. जनकल्याण फाउंडेशन चे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,ग्रामीण भागात अशा कार्यक्रमाची नितांत गरज असून जनकल्याण फाउंडेशन हे काम करत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे.
यावेळी प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी प्रास्ताविक केले, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांनी आभार मानले तर रज्याक शेख,डॉ संतोष तागड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अविनाश मंत्री, ॲड.बन्सी सातपुते यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कवी सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्य संमेलनात चंद्रकांत कर्डक,गीताराम नरवडे, आनंदा साळवे,बाळासाहेब मंतोडे,आत्माराम शेवाळे, डॉ बेंनजीर शेख यांच्यासह अनेकांनी आपल्या गीत रचना सादर केल्या तर या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोठुळे यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्याबद्दल अविनाश घुले, पत्रकारिता बद्दल अविनाश मंत्री, साहित्याबद्दल प्रकाश खंडागळे, आरोग्य सेविका ज्योती तोडमल, कृषिभूषण प्रवीण रोकडे, कलावंत किरण बेरड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.शाहीर भारत गाडेकर यांनी महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.