नाशिक दिनकर गायकवाड नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील श्रावस्ती नगरमध्ये घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमधून सुमारे दीड ते दोन लाख रुपये किंमतीच्या सतरा अठरा बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.
चोरट्यांनी सुरवातीला येथे असलेल्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या त्यानंतर आपला मोर्चा गोठ्याकडे वळवला येथून सर्व बकऱ्या चोरी करून पोबारा केला आहे.याआधी देखील याच भागात असलेल्या मोकाट जनावरांना चोरट्यांनी लक्ष केले होते.मात्र तेव्हाही चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
आता त्यांनी आपला मोर्चा बकऱ्यांकडे वळवला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे? जर शहरात येताना प्रत्येक वाहन तपासले जाते मग चोरटे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरे घेऊन जातातच कसे, असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे,की मनमाड शहरातील श्रावस्ती नगर भागात राहणाऱ्या भावेश सोनवणे यांचा आपल्या घरामसोर पत्र्याचा गोठा आहे. या गोठ्यात जवळपास २ छोटी पिल्ले धरून २० बकऱ्या होत्या. काल रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान पिकअप गाडीतुन काही चोरटे आले आणि त्यांनी या भागात असणाऱ्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावून सरळ पिकअप गाडी गोठ्याजवळ लावली व राजरोसपणे सर्व बकऱ्या गाडीत घालून चोरून नेल्या. बकऱ्यांचा आवाज आल्याने सोनवणे कुटुंब जागे झाले त्यांनी बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला मात्र बाहेरून दरवाजा लॉक असल्याने त्यांना येता आले नाही त्यांनी घरांतूनच आरडाओरडा केला मात्र इतरांनाही बाहेर येता आले नाही. कारण सर्वांचे दरवाजे बंद होते यानंतर भावेश सोनवणे यांनी मागील दरवाजा खोलून बाहेर आले व पिकअप गाडीचा पाठलाग केला, मात्र चोरटे पळून गेले.
या भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत आहेत. याबाबत पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र पोलीस देखील रात्रीची गस्त वाढवत नाही यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या भागात चोन्या वाढल्याने गस्त वाढवावी, अशी मागणी भाजपच्या अनिता इंगळे यांनी केली आहे.