भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगाकडे विनंती, सुनावणी अंतिम टप्प्यात
नागपूर, सिटीलाईन न्यूज नेटवर्क भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटने प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवावे असा अर्ज दोन महिन्यापुवींच दिल्याची माहिती याप्रकरणी लढा देत असलेले ॲड. किरण चन्ने यांनी बुधवारला नागपुरात पत्रपरिषदेत दिली.
ही घटना घडली तेव्हा फडणवीस सरकार राज्यात होते. याप्रकरणी त्यांची चौकशी व उलटतपासणी महत्वाची असेल, याकडे ॲड.चन्ने यांनी लक्ष वेधले. सेवानिवृत्त न्या. जे. एन. पटेल व माजी सनदी अधिकारी सुमीत मलीक यांचा समावेश असलेला आयोग याप्रकरणी चौकशी करीत आहे.
आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली. सध्या आयपीएस अधिकाऱ्यांची सुनावणी होत आहे. याच प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची उलट तपासणी झाली. त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर निष्काळजी पणाचा आरोप केला आहे. शिवाय, फडणवीस सरकारनेही त्या घटनेप्रकरणी
पारदर्शक अशी कारवाई न करता याप्रकरणी संशयीत असलेल्यांना पाठीशी घातल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे त्यांना समन्स पाठवून त्यांची उलट तपासणी करण्याची संधी द्यावी असा अर्ज दोन महिन्यापुर्वीच दिल्याचे अँड. चन्ने यांनी सांगितले. यावेळी रिपाईंचे विदर्भ अध्यक्ष दिनेश अंडरसहारे, दिनेश गोडघाटे, प्रा. राहुल मून, बाळूमामा कोसमकर, राहूल दहिकर यांच्यासह इतरही उपस्थित होते.