कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा लढा-आमदार रोहित पवार
अमरावती सिटीलाईन न्यूज नेटवर्क शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, दुर्बल आदी घटकांसाठी परिणामांची पर्वा न करता रस्त्यावर उतरणारा आणि परिणामी टोकाची भूमिका घेणारा नेता म्हणजे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू.गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
सरकारने दिलेल्या आश्वासना प्रमाणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह त्यांच्या इतर मागण्या आहेत.
निवडणुकीपूर्वी या सरकारनेच याबाबत आश्वासन दिलं होतं, पण सत्तेत येताच त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडला. म्हणूनच सरकारला जागं करण्यासाठी ते उपोषण करतायेत.
या उपोषणाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळं त्याला वेगळं वळण देण्यासाठी सरकार वेगवेगळे राजकीय डावपेच आखत आहे, परंतु बळीराजाच्या गळ्यातील फास काढण्यासाठी आम्ही सर्वजण बच्चू कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत. त्यासाठीच त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला आणि बच्चू कडू यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.त्यांची प्रकृती क्षीण होत असली तरी निर्धार मात्र ठाम आहे. यावेळी खासदार अमर काळे, मा. आ. सुनील भुसारा जी, मा. आ. प्रकाश गजभिये, सलील देशमुख, ॲड. रविकांत वर्पे, पंकज बोराडे, विकास लवांडे आदी उपस्थित होते.
एकेकाळी सरकार सोबत काम केलेल्या एका सहकाऱ्यावर सरकार पाच-पाच दिवस उपोषण करण्याची वेळ आणत असेल तर हे सरकार किती निर्दयी आहे, हे दिसतं. सरकारने अधिक दिरंगाई न करता तातडीने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात,अन्यथा या आंदोलनाची धग अधिक वाढेल आणि त्याचे चटके सरकारला बसल्याशिवाय राहणार नाहीत.
