नाशिक दिनकर गायकवाड सोप्या पद्धतीने कर्ज करून देतो,असे सांगत त्याच्या प्रकिया शुल्कासाठी घेतलेल्या सहा लाख रुपयांपैकी फक्त ५० हजार रुपये परत देऊन युवकाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना वडाळा शिवारात घडली.
सविस्तर वृत्त असे की पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती सांगताना म्हटले आहे,की फिर्यादी जयेश मोहन मिस्त्री (वय २८,रा. खोडेनगरजवळ, वडाळा शिवार) यांना व्यवसायासाठी कर्ज हवे होते. दि. १७ जून २०२३ रोजी त्यांची भेट आरोपी इक्बाल कुरेशी (रा. मिरा रोड, ठाणे) व अरविंद तिवारी (रा. भाईंदर, ठाणे) यांच्याशी झाली. दोघांनी मिस्त्री यांच्या घरी झालेल्या बैठकीत
त्यांचा विश्वास संपादन करून ६० कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो,असे आमिष दाखविले. त्यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून सहा लाख रुपये लागतील, असे ते म्हणाले. त्यानुसार मिस्त्री यांनी त्यांना सहा लाख रुपये दिले. त्या बदल्यात आरोपींनी मिस्त्री यांना ॲक्सिस बँकेचा बनावट डीडी व फुलट्रॉन इंडिया, मुंबई या वित्तीय संस्थेचे बनावट प्री-लोक सॅक्शन लेटर दिले.
कुरेशी व तिवारी यांनी सँक्शन लेटर दिल्यानंतर कोणतेही लोन मंजूर झाले नसल्याचे मिस्त्री यांच्या लक्षात आले.आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजताच त्यांनी आरोपींकडे प्रोसेसिंग फी म्हणून दिलेल्या सहा लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी ५० हजार रुपये देत उर्वरित साडेपाच लाख रुपये त्यांना अद्याप दिलेले नाहीत. या प्रकरणी दोघांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोडे करीत आहेत.
