मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आयोजित ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान समारंभ नुकताच मुंबई येथे पार पडला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.यावेळी राज्यातील १०९ आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.या निमित्तानं सर्व शिक्षकवृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की,आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम अधिक रंजक, विचारप्रवर्तक आणि विद्यार्थीकेंद्रित केला आहे. आपले शिक्षण हे आता आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे असणार आहे.आता पाठ्यपुस्तके केवळ माहिती देणार नाहीत,तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला,विचार करायला आणि विश्लेषण करायला शिकवतील.सर्व गुरुजन या बदलाला सुद्धा आत्मविश्वासाने सामोरे जातील, याची मला खात्री आहे.
जागतिक स्तरावर जगामध्ये सर्वोत्तम १० शाळांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आणणारे आमचे दत्तात्रय वारे गुरुजी,३६५ दिवस चालणारी,राज्यघटनेचे कलम पाठ करून घेणारी आणि दोन्ही हातांनी मुलांना लिहायला शिकवणारी अशी सर्वोत्तम शाळा निर्माण करणारे आमचे केशव गावित,गडचिरोली सारख्या आदिवासी भागात शिक्षणाचे महत्व पटवून देणारे आमचे दिलीप नाकाडे व खुर्शीद शेख, अशी कितीतरी उदाहरणे आहेत जी नेहमी सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देत आहेत.“शाळा बदलते,फक्त एक जिद्दी शिक्षक लागतो” हे या शिक्षकांनी दाखवून दिले आहे.
याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे प्राथमिक,माध्यमिक आणि आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा तसेच कला-क्रीडा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यासोबतच शैक्षणिक,कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेख मोहम्मद वाकुद्दीन, संदीपान जगदाळे,अरुणा पवार व प्रणोती बागडे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
