आश्वी संजय गायकवाड महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर गेली सलग २९ वर्षे घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळ नवरात्रीत घटस्थापने पासून ते विजयादशमी पर्यंत दररोज चढाई करून शिखर स्वामिनी कळसुबाई मातेचरणी नतमस्तक होत आहे.
यंदा देखील मंडळातील शिखरप्रेमी,शिवप्रेमी व गडप्रेमी गिर्यारोहकांनी मुसळधार पावसात आणि जोरदार वाऱ्यातही हा परंपरेचा उपक्रम उत्साहात पार पाडला. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजयाचा दिवस,शिखरावर मंगलमय वातावरण निर्माण झाले.
कळसुबाई मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या घटकलशाचे विसर्जन करून मातेचा दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली.त्यानंतर गिर्यारोहकांनी भक्तांना आपट्याची पाने देत गळाभेटी घेतल्या आणि “विजयादशमीच्या शुभेच्छा” देत दसरा मोठ्या भक्तिभावात साजरा केला.
नवरात्रीतील नऊ दिवस शिखरावर जाऊन मातेची अखंड सेवा करण्याचा संकल्प यंदाही पूर्ण झाला आणि पुढील वर्षी पुन्हा नव्या जोमाने हाच परंपरेचा वारसा सुरू ठेवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली.
या कष्टप्रद व कठीण उपक्रमाला सलग २९ वर्षे सातत्याने वाहून नेणाऱ्या कळसुबाई मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या धार्मिक उत्सवात संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्यासह निलेश आंबेकर,प्रवीण भटाटे,काळू भोर,निलेश पवार,बाळू आरोटे,अशोक हेमके,सोमनाथ भगत,भगवान तोकडे,कैलास नवले,बाळू भोईर,राजेंद्र माने, विकास जाधव, ज्ञानेश्वर मांडे, गणेश काळे,भाऊसाहेब जोशी, श्रावण सोपे, गुरुनाथ आडोळे, चेतन जाधव, चेतन छत्रे,नामदेव जोशी,नाना टाकळकर,कृष्णा वाहुले, यश हेमके, सोनू गिते, शुभम जाधव,किरण अहिरे, दीपक आरोटे, राजू मराडे, हरीश आतकरी, समाधान बिन्नर यांच्यासह इतर असंख्य गिर्यारोहकांनी सहभाग घेतला.
भक्तिभाव,श्रद्धा आणि साहसाचा अनोखा संगम घडवणारा हा धार्मिक उपक्रम आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
