केंद्रिय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांची रिपाइंच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे महायुतीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत असतील तिथे रिपब्लिकन पक्षाने युतीसाठी भाजपला प्राधान्य द्यावे जिथे भाजपकडून समाधानकारक जागा मिळत नसतील तिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करावी मात्र कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी मधील घटक पक्षांसोबत रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी युती करू नये.प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढावी मात्र महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करू नये अशा सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नामदार रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमा आठवले रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम;काकासाहेब खंबाळकर; युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; ईशन्य भारत प्रभारी विनोद निकाळजे;महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे; ॲड.आशा लांडगे; मुंबई अध्यक्षा उषा रामलू आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे अनेक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे आपल्याला अधिकाधिक जागा कशा मिळतील, यावर भर देताना पाहायला मिळत आहे. दरम्यान,आगामी निवडणुकासाठी आम्ही भाजपासोबत आहोत.मात्र आम्हाला जर मनासारख्या जागा नाही मिळाल्या तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत, असा इशारा ना. रामदास आठवले यांनी दिलाय.
रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटप आणि रिपब्लिकन पक्षाचा महायुती सरकारमधील सहभाग, निवडणूक कोणत्या जिल्ह्यात महायुतीसोबत लढवायची आणि कोणत्या जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवायची आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान,निवडणुकीच्या धरतीवर कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीला अनेक जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आम्ही भाजपासोबत आहोत.पण कर्म,धर्म,संयोगाने जर भाजपाने आम्हाला ज्या जागा हव्या आहेत,त्या दिल्या नाहीत तर मग कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत,असा सूचना आम्ही कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी दिली आहे.समन्वय समितीच्या बैठकीला बोलवावे : दुसरीकडे मुंबईसह आमची राज्यात देखील ताकद आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक किंवा मुंबई महापालिका निवडणुकीत आमची जेवढ्या जागांची मागणी आहे,तेवढ्या जागा भाजपाने द्याव्यात,अन्यथा आम्ही काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवू,असं रामदास आठवलेंनी म्हटले आहे. विशेष म्हणजे महायुती सरकारमध्ये आमचा सहभाग आहे. पण प्रत्येक मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची जी बैठक होते. त्या बैठकीला रिपब्लिकन पक्षाला आमंत्रित केले जात नाही. त्यामुळं आम्हाला सुद्धा त्या बैठकीला बोलावण्यात यावे,यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
