जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना पुनर्वसन समितीचे निवेदन
श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला असून, या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना तातडीच्या पुनर्वसनाची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीत जिल्ह्यातील विविध खात्यांच्या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आले असता, समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी अधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की,श्रीरामपूर नगरपरिषदेने नेवासा रोड, गोंदवणी रोड, बेलापूर रोड तसेच पोलीस स्टेशन समोरील परिसरातील अतिक्रमण काढून अनेक छोट्या व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले आहे. गेल्या एक वर्षापासून हे व्यापारी बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले असून, रोजची रोजी-रोटी कमवणेही त्यांच्यासाठी अशक्य झाले आहे. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
या संदर्भात यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले होते. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुनर्वसनाबाबत सूचना केल्या होत्या, मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. तसेच गेल्या वर्षभरात जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप प्रत्यक्ष पुनर्वसन झालेले नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की,श्रीरामपूर नगरपरिषदेवर सध्या काँग्रेसची सत्ता असून, निवडणुकीपूर्वी विस्थापित व्यापाऱ्यांना पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अन्यथा श्रीरामपूर शहरात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी,“विस्थापित व्यापाऱ्यांचा पुनर्वसन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, लवकरच त्यावर ठोस निर्णय घेतला जाईल,” असे सांगत पुनर्वसनाचे सुतोवाच केले.
यावेळी विस्थापित व्यापारी रवी चव्हाण, किशोर शहाणे, अक्षय गवळी, शाहरुख मन्सुरी, सुनील दंडवते, रईस शेख,तेजस गायकवाड आदी उपस्थित होते.एक वर्ष उलटूनही पुनर्वसन न झाल्याने व्यापाऱ्यांचा संयम सुटत असून,प्रशासनाकडून तात्काळ निर्णय होणार का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
