सखोल चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची भारतीय लहुजी सेनेची जोरदार मागणी
हनुमंतगाव संदीप गावडे लातूर येथील केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या मातंग समाजातील अवघ्या १२ वर्षीय अनुष्का किरण पाटोळे या चिमुकल्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना केवळ एका विद्यार्थिनीचा मृत्यू नसून, देशातील निवासी शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची भारतीय लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
अनुष्का पाटोळे ही अतिशय हुशार, गुणी व कर्तृत्ववान विद्यार्थिनी होती.अभ्यासात प्रावीण्य मिळवणारी आणि उज्ज्वल भवितव्य असलेली ही मुलगी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेईल, हे तिच्या कुटुंबीयांसह समाजालाही मान्य नसलेले आहे. मात्र, नवोदय विद्यालय प्रशासनाकडून ही घटना आत्महत्येची असल्याचे सांगण्यात येत असून, हे स्पष्टीकरण अनेक संशयांना जन्म देणारे आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय लहुजी सेना व सकल लहुजी सैनिक, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. घडलेल्या घटनेबाबत हत्या की आत्महत्या याचा सखोल व पारदर्शक तपास करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
अनुष्कावर शाळा किंवा वसतिगृहात मानसिक,शारीरिक अथवा जातीय छळ झाला होता का, याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे लहुजी सेनेचे म्हणणे आहे. विशेषतःअनुसूचित जातीतील विद्यार्थिनीचा निवासी शाळेत संशयास्पद मृत्यू होणे, ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा इशाराही देण्यात आला आहे.
घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रे किंवा इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आले का,याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच इतर विद्यार्थिनींचे गोपनीय जबाब नोंदवून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता,या घटनेची चौकशी सीबीआय किंवा विशेष तपास पथक मार्फत करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा,अशी ठाम मागणी लहुजी सेनेने केली आहे.प्रशासनालाही जबाबदार धरण्याची मागणी या प्रकरणात केवळ शाळा प्रशासनच नव्हे, तर लातूर जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस निरीक्षक, पालकमंत्री व खासदार यांनाही सहआरोपी करून त्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अनुष्काच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, पुनर्वसन तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्यातील व देशातील सर्व निवासी शाळा व वसतिगृहांचे सुरक्षा ऑडिट करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.
या प्रकरणाची दखल घेत राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राज्यव्यापी व देशव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा भारतीय लहुजी सेनेने दिला आहे.
आता मेणबत्ती नाही जळणार,आता आरोपी जळणार!”
अशा तीव्र शब्दांत मातंग समाजाने आपला संताप व्यक्त केला असून,अनुष्का पाटोळेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
संगमनेर तालुका अध्यक्ष लहुजी सेना गणेश बलसाने, राज्य संघटक भाऊसाहेब आव्हाड, तालुका कार्याध्यक्ष संतोष भडकवाड, संपर्क प्रमुख दगडु साळवे, राज्य सरचिटणीस रामभाऊ पिंगळे, तालुका उपप्रमुख राजु साळवे, सामाजिक कार्यकर्ते अजय खैरनार,शिर्डी शहर प्रमुख दिपक पेटारे, संगमनेर शहराध्यक्ष मनिषा कांबळे आदी पदाधिकारी यांनी संगमनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले.
