आरोपींची सरळ तुरुंगात रवानगी
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील
आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.लूटमार आणि प्राणघातक हल्ला करणाऱ्या रविंद्र उर्फ बंटी मदने आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आता नवीन कायद्यानुसार 'संघटित गुन्हेगारी' (कलम १११) चे वाढीव कलम लावण्यात आले आहे.या कारवाईमुळे आरोपींना आता किमान एक वर्ष जामीन मिळणे कठीण झाले असून,नवीन कायद्याची ही पहिलीच मोठी प्रभावी अंमलबजावणी मानली जात आहे.
नेमकी घटना काय होती?
११ ऑगस्ट २०२४ रोजी आश्वी बुद्रुक येथील दाढ रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर फिर्यादी आणि त्यांचे मित्र उभे असताना, आरोपींनी "तुम्ही रात्रीचे इकडे का फिरता?" असे म्हणून वाद घातला. फिर्यादीने उत्तर दिले असता,आरोपींना राग आला आणि त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर फिर्यादीच्या खिशातील २५ ते ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि चाकूने भोसकून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
टोळीचा गुन्हेगारी इतिहास
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रविंद्र उर्फ बंटी आबासाहेब उर्फ रावसाहेब मदने (वय २७), वसीम रशिद शेख (वय २२) आणि तुषार विलास सोनवणे (वय २१) यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.बंटी मदने हा या टोळीचा प्रमुख असून त्याच्यावर मारहाण, दरोडा, आणि विनयभंगासारखे अनेक गुन्हे आश्वी आणि घारगाव पोलीस ठाण्यात नोंदवलेले आहेत.
मोक्का सारखीच कठोर शिक्षा!
नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ हे संघटित गुन्हेगारीसाठी नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. पूर्वीच्या 'मोक्का' कायद्याप्रमाणेच या कलमात शिक्षेची तरतूद असून, आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांनी मंजुरी दिली आहे.
कारवाईतील पथक ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पो.हे.कॉ. राम लहामगे, पो.कॉ. सचिन सातपुते यांनी केली आहे.प्रशासकीय कायद्याचा हा दणका पाहून गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
-नव्या कायद्याने जामीन मुश्किल
"आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.या कलमामुळे आरोपींना सहज जामीन मिळणार नाही.नवीन कायद्याची ही प्रभावी अंमलबजावणी असून गुन्हेगारांवर याचा मोठा वचक बसेल."
- सोमनाथ वाघचौरे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर)
