आदन मदन यात्रा सर्व धर्मांना जोडणारी-डॉ.सुजय विखे पाटील

Cityline Media
0
दाढ बुद्रुक प्रतिनिधी प्रवरेच्या खोऱ्यात वसलेल्या राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेली आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची मर्यादित परंपरा नसून सर्व धर्मांना एकत्र आणणारा उत्सव आहे,असे ठाम प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील यांनी नुकतेच येथे केले.
दाढ बुद्रुक येथे आदन मदन बाबा यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना त्यांनी सामाजिक सलोखा,संयम आणि एकात्मतेचा संदेश दिला.

अनेक वर्षे खंडित झालेली ही यात्रा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी पुन्हा सुरू झाली असून यंदा तिचे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि परस्पर सहकार्यामुळे यात्रा अत्यंत शांततेत व भव्य स्वरूपात पार पडली होती.त्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले.

यावेळी प्रवरा उद्योग समूहाचे पदाधिकारी, गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, यात्रा उत्सव समितीचे सदस्य तसेच सर्व समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विखे परिवाराच्या वतीनेही या तीन दिवसांमध्ये कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

प्रवरा परिसराची ओळख ही सर्व धर्मीय एकात्मतेची आहे. येथे धर्माच्या नावावर भेदभाव कधीच होऊ दिला जाणार नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचे सण-उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासोबत इतरांच्या भावनांचा आदर राखणे तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

माफी करणारा माणूस हा चूक करणाऱ्यापेक्षा मोठा असतो.त्यामुळे यात्रेदरम्यान संयम राखून,शांतता टिकवून ही परंपरा अधिक भक्कम करावी,असे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.

यात्रेच्या निमित्ताने गावाच्या विकासासंदर्भातही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.आदन मदन बाबा प्रांगणात नियोजनबद्ध पद्धतीने नवीन वास्तू उभारण्याचा मानस व्यक्त करताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच नियोजन करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी, स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणे व संरक्षक भिंत उभारणे आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून, सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. पुढील वर्षी अधिक सुसज्ज आणि नियोजनबद्ध स्वरूपात यात्रा साजरी करण्याचा आपला संकल्प आहे,असेही त्यांनी सांगितले.

शेवटी,आपली एकजूट हीच आपली खरी ताकद आहे. ही एकात्मता अबाधित ठेवणे हीच आदन मदन बाबा यात्रेची खरी परंपरा आहे,असे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना एकतेचा संदेश दिला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!