११२ कुटुंबांना अन्नधान्य वाटप
हनुमंतगाव संदीप गावडे राहता तालुक्यातील हनुमंतगाव येथे एकलव्य सेनेच्या वतीने ऐन उन्हाच्या तडाख्यात आदिवासी समाजातील गरजू कुटुंबांसाठी अन्नधान्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गावातील तब्बल ११२ आदिवासी भिल्ल कुटुंबांना प्रत्येकी दोन पायली बाजरीचे वाटप करण्यात आले.
सध्या उन्हाच्या तडाख्यात रोजगार नसणे,सध्या वाढती महागाई,रोजगाराची कमतरता आणि ग्रामीण भागातील आर्थिक अडचणी लक्षात घेता अनेक कुटुंबांना दैनंदिन जीवन जगताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशा परिस्थितीत एकलव्य सेनेने पुढाकार घेत आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रम दरम्यान एकलव्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी सांगितले की समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. “आदिवासी समाजातील कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये,तसेच गरजू बांधवांना वेळोवेळी मदत मिळावी,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
धान्य वाटपासाठी सकाळपासूनच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक कुटुंबाला बाजरीचे वाटप करण्यात आले.यावेळी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत एकलव्य सेनेचे ज्ञानेश्वर अहिरे यांचे आभार मानले.एकलव्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी भविष्यातही शिक्षण,आरोग्य,अन्नधान्य मदत आणि सामाजिक जनजागृती यांसारखे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे आदिवासी भिल्ल समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.यावेळी एकलव्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे,संरपंच मनीषा माळी,सदस्य सुभाष ब्राम्हणे,संदिप गावडे,संतोष राहींज,शुभम तुंबारे,अनिल माळी,शब्बीर शेख,बाळासाहेब पिंपळे,सुजित पर्वत,अविनाश ब्राम्हणे,निवृत्ती पिंपळे,त्रृषीकेश अहिरे,कमलबाई शिंदे ,नेहाबाई बर्डे ,नंदा बर्डे ,संगीता बर्डे,अनिता माळी,जिजाबाई गोलवड,युवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
