आश्वी संजय गायकवाड आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसाचा मोकळा वेळ पूर्णपणे हिरावून घेतला गेला आहे.माणूस अगदी दोन मिनिटेही रिकामा बसू शकत नाही,तो लगेच मोबाईलमध्ये व्यग्र होतो.या सवयीचे सर्वात वाईट परिणाम लहान मुलांवर होत असून, त्यांच्यातील संयम कमी होत चालला आहे," अशी चिंता अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी आश्वी खुर्द येथे व्यक्त केली.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.यावेळी त्यांनी बालविकासासाठी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
वाचनामुळे होईल मुलांचा सर्वांगीण विकास होतो असे स्पष्ट करत मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी पुढे म्हणाले की, "आजकाल मुले ऐकत नाहीत,अशी पालकांची तक्रार असते.यावर उपाय म्हणून मुलांना वाचन,मैदानी खेळ आणि विविध कलांकडे वळवणे गरजेचे आहे.
मराठी साहित्यात खूप मोठे आणि दर्जेदार लेखक व कवी आहेत. मुलांनी या साहित्याचे वाचन केल्यास त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळेल."
ग्रामपंचायतीने 'वाचन कट्टा' सुरू करावा
मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आश्वी खुर्द ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शाळेमध्ये एक सुंदर वाचनालय किंवा 'वाचन कट्टा' सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली.
पालकांनी मुलांना केवळ पुस्तके आणून न देता, आठवड्यातून किमान दोन दिवस एक-एक तास त्यांच्याकडून वाचन करून घ्यावे आणि वाचलेल्या पुस्तकाचा सारांश लिहिण्याची सवय लावावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण सिनारे सहाय्यक गटविकास विस्तार राजेंद्र ठाकुर विस्तार अधिकारी संदानंद डोके अधिकारी सरपंच सौ. अलका गायकवाड उपसरंपच बाबा भवर ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे ग्रा.प.सदस्य सागर भडकवाड संजय भोसले अदिनाथ जाधव रावसाहेब जेडगुले उज्वला भुसाळ नंदकिशोर राखपसरे बाळासाहेब राक्षे उपस्थित होते.
