निमजला ८९ लाखांच्या विकास कामांचा आमदार खताळांच्या हस्ते शुभारंभ
संगमनेर प्रतिनिधी"मी महाराष्ट्रातील २८८ आमदारांमध्ये स्वतःला सर्वात नशीबवान आमदार समजतो. तालुक्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे एका भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून विधान सभेत पोहोचलो.जनतेच्या विश्वासा मुळे संगमनेर पासून दिल्लीपर्यंत वेगळी ओळख निर्माण झाली आहे," असा टोला आमदार अमोल खताळ यांनी मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.
संगमनेर तालुक्यातील निमज येथे सुमारे ८९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे,भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, सरस्वती पतसंस्थेचे संस्थापक काशिनाथ डोंगरे, अध्यक्ष बादशाह गुंजाळ,उपाध्यक्ष शशिकांत मतकर, संपत फड, म्हतु शेरमाळे, गोरख डोंगरे, रणजीत जाधव, पुंजा डोंगरे, संतोष डोंगरे, संदीप कासार, विश्वास कासार, रामनाथ शिंदे, अनिल गुंजाळ, पद्माकांत मतकर, भाऊसाहेब शेरमाळे, ॲड.मीनानाथ शेळके, रोहिदास साबळे,वैभव नाईकवाडी,सागर खताळ, मिलिंद खताळ,सुनील रुपवते, शिवाजी गुंजाळ, सुभाष मतकर, रामनाथ शेटे,गणपत डोंगरे, दादा डोंगरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले, निमज गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही.मात्र विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांना योग्य वेळी जनता उत्तर देईल.जनसेवा मंडळाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सुरुवातीपासून संघर्ष करणारे अनेक सहकारी आजही माझ्यासोबत आहेत. त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.ते पुढे म्हणाले, "पूर्वी निधी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीतील राजकारणामुळे तो परत जावा लागला,ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.देणारा तयार असूनही घेणाऱ्याची मानसिकता नसेल, तर त्याचा थेट फटका गावाच्या विकासाला बसतो.
आमदार झाल्यापासून तालुक्यातील कोणत्याही गावाला निधी वाटप करताना कधीही भेदभाव केला नाही. ज्या गावात मला कमी मतदान झाले, त्या गावातील नागरिकही माझेच मतदार आहेत,या भावनेतून विकासकामांना प्राधान्य दिले आहे. विकासकामांमध्ये कितीही अडथळे आणले, तरी निधी उपलब्ध करून देणे थांबवणार नाही," असेही आमदार खताळ यांनी सांगितले.
'जिरवा-जिरवी' नव्हे, आता 'पाणी जिरवण्याचे' राजकारण
संगमनेर तालुक्यात गेली चाळीस वर्षे केवळ जिरवा-जिरवीचे राजकारण झाले.मात्र आता माणसे जिरवायची नाहीत,तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पांना गती देऊन पाणी जिरवण्याचे काम करायचे आहे. भोजापूर चारीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यात यश आले असून परिसरातील ओढे-नालेही भरले आहेत.साकूर भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपसा सिंचन योजना व बंधाऱ्यांसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
-आमदार अमोल खताळ
