नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ सुजय विखे पाटील ठाम !

Cityline Media
0
विरोधकांना थेट प्रत्युत्तर, पुराव्यांसह मांडली भूमिका

शिर्डी (प्रतिनिधी )अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे.अभ्यासूपणे केलेले हे वक्तव्य विरोधकांना न समजल्याने व तेवढा अभ्यास त्यांचा नसल्याने राजकीय पोळी भाजण्यासाठी ते रान उठवत आहे या प्रश्नावर मला विरोधकांना उत्तर देण्याची गरज नाही परंतु जनतेला उत्तर देणे माझे दायित्व आहे. रस्त्याच्या कामांना युद्धजन्य परिस्थिती व डोनाल्ड ट्रम्प हेच जबाबदार असल्याचे वक्तव्यावर मी आजही ठाम असल्याचा पुनर्रचार करत दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली हे वक्तव्य मी मार्मिक व मिश्किलपणे केले होते याचा अर्थ काहींनी वेगळा काढला आहे हे मिस्कील वक्तव्य मी मागे घेत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते राजेंद्र गोंदकर यांच्यासह नगर परिषदेच्या नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कार्यपद्धतीमुळे युद्ध लादल्याने डांबराची उपलब्धता व आयात कमी झाली डांबर आयातीवर संकट आले त्यामुळे देशातील अनेक रस्त्यांची कामे थांबली त्यात अहिल्यानगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुद्धा संथ गतीने होत आहेत.

अमेरिकेच्या युद्ध धोरणामुळे पश्चिम आशियातून डांबराचा पुरवठा घटला,दर वाढले आणि त्याचा परिणाम देशातील रस्त्यांच्या कामांवर झाला,’ या आपल्या आधीच्या वक्तव्यावर मा.खासदार डॉ. सुजय विखे पाटील ठाम राहिले आहेत. ‘मी प्रत्येक वाक्य पूर्ण अभ्यास करून बोलतो.

माझ्या वक्तव्याला अधिकृत आकडेवारी,शासकीय पत्रे आणि परदेशी व भारतातील विविध वृत्तपत्रांतील वृत्तांचे आधार आहेत. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.

भारताला दरवर्षी सुमारे ९० लाख मेट्रिक टन डांबराची गरज भासते.त्यातील सुमारे निम्मे डांबर देशांतर्गत तेलशुद्धीकरण कारखान्यांमध्ये तयार होते,तर उर्वरित डांबर इराक,संयुक्त अरब अमिराती,इराण आणि बहरीन या देशांतून आयात केले जाते,असा दावा डॉ. विखे यांनी केला.

युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांतून होणाऱ्या डांबराच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून,आयातीत सुमारे ७८ टक्क्यांची घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.दर ४८ हजारांवरून ८३ हजार ६५२ रुपये
डांबराच्या दरवाढीची आकडेवारीही त्यांनी मांडली.

फेब्रुवारी २०२६मध्ये प्रति मेट्रिक टन सुमारे ४८ हजार रुपये असलेला डांबराचा दर काही महिन्यांत वाढून ८३ हजार ६५२ रुपयांवर पोहोचला.त्यामुळे दरात सुमारे ७१ टक्क्यांची वाढ झाली आहे. डांबराच्या वाढलेल्या दरामुळे रस्त्यांच्या कामांवर परिणाम झाला असून, केंद्र सरकारने कंत्राटदारांना वाढीव दर देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ केंद्र सरकारची अधिकृत आकडेवारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची पत्रे तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांतील वृत्तांचे दाखले त्यांनी दिले.‘विरोधकांनी आधी जागतिक घडामोडींचा अभ्यास करावा आणि मगच टीका करावी,’ असा टोला त्यांनी लगावला.

दारू संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या वादावरही डॉ.विखे यांनी स्पष्टीकरण दिले.ते विधान मार्मिक आणि उपहासात्मक शैलीत केले होते;मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून ते शब्द मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘निवडून दिलेल्यांनी हात वर केले म्हणून मला रस्त्यावर उतरावे लागले’नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेवरून सुरू असलेल्या राजकीय टीकेलाही डॉ. विखे यांनी थेट प्रत्युत्तर दिले. ‘माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हात वर केल्यामुळे आज निवडणुकीत पराभूत झालेल्या माणसाला जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून हे काम हाती घ्यावे लागत आहे,’ असा घणाघात त्यांनी केला.

रस्त्याच्या कामात दिरंगाई झाली असून काही ठिकाणी कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आहेत आणि रस्ता खचल्याच्या तक्रारीही खऱ्या असल्याचे त्यांनी मान्य केले. ‘ठेकेदार माझा नातेवाईक नाही. मात्र जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन त्याच्याकडून दर्जेदार काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ठेकेदारावर कारवाई केली तर रस्ता कोण पूर्ण करणार?’रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी सवाल केला. ‘राहात्यातील काही नेते चौकशी लावण्यासाठी आणि गुन्हे दाखल करण्यासाठी केंद्राला चार-चार पानी पत्रे पाठवत आहेत.ठेकेदारावर कारवाई होऊन तो काम सोडून गेला, तर उर्वरित रस्ता हे नेते स्वतः पूर्ण करून देणार आहेत का? याचे उत्तर त्यांनी आधी जनतेला द्यावे,’ असे आव्हान त्यांनी दिले.
केवळ पत्रे पाठवून आणि आरोप करून रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही.जनतेला दर्जेदार आणि पूर्ण रस्ता हवा आहे. त्यामुळे काम थांबविण्याऐवजी ते पूर्ण करून घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘रस्त्यासाठी आवाज उठवायला ग्रामपंचायत सदस्य असण्याची गरज नाही.मी या देशाचा करदाता नागरिक आहे. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या करातून हा रस्ता होत आहे. या रस्त्यावर अपघातात जीव गमावणारे नागरिक माझे आहेत.त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून मला प्रश्न विचारण्याचा आणि काम पूर्ण करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ असे विखे म्हणाले.‘पराभवाने कोणी संपत नाही’
आपल्या राजकीय भवितव्याबाबतही त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ‘एका निवडणुकीतील पराभवाने कोणी माजी होत नाही किंवा संपत नाही. निवडणूक पुन्हा होणार आहे. २०२९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लागणारा निकाल सर्वांसमोर असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक परिस्थितीमुळे अडचणी निर्माण झाल्या असतानाही नगर-मनमाड रस्त्याचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा डॉ. विखे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!