डॉ.रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव) संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील श्री.क्षेत्र रामेश्वर देवस्थान एक जागृत व पवित्र देवस्थान म्हणून ओळखले जाते.संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक येथे दर्शनासाठी येतात,देवस्थानला धार्मिक,ऐतिहासिक,पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली असून.स्वतःश्रीरामांनी या देवस्थानची स्थापना केल्यामुळे या शिवलिंगाला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहेअशा प्रकारे धार्मिक,पौराणिक महत्व असलेले रामेश्वर देवस्थान सध्या येथे होत असलेल्या विकास कामांमुळे पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे.तालुक्यातील सर्वात मोठे नावलौकिक असलेले देवस्थान म्हणून ओळखले जात आहे.येथे महाशिवरात्र महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित वतीने २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर ( ३७५ )अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संगीत गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताह निमित्त दररोज हजारो भाविक अन्नदानाचा लाभ घेत आहे.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर नाशिक यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
श्रीक्षेत्र रामेश्वर देवस्थानची स्थापना - प्रभुरामचंद्र आपल्या पत्नी सीता व बंधू लक्ष्मण यांच्या समवेत वनवासाला निघाले होते.नाशिक येथील पंचवटी या पवित्र तिर्थस्थळी त्यांनी वनवासाचे दिवस घालवण्यास सुरुवात केली आणि याच ठिकाणाहुन रावणाने सीतामातेचे अपहरण केले.सीता दिसेना म्हणून श्रीराम शोध घेऊ लागले.याच दंडकारण्यात अनेक महान तपस्वी राहत होते.म्हणून हा परिसर साधूसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणुन ओळखली जाते.या अरण्यात सीतेचा शोध घेता घेता त्यांना घायाळ अवस्थेत जटायू पक्षी दिसला.ज्या ठिकाणी स्वतःश्रीरामांनी जटायूचा उत्तरक्रिया विधी पार पडला ते ठिकाण आजही टाकेद नावाने ओळखले जाते.हे ठिकाण इगतपुरी तालुक्यात स्थित आहे.तुलसीरामायणात वर्णन केल्याप्रमाणे पुढे सीतेचा शोध घेण्यासाठी ते दंडकारण्यातील धांदरफळ येथील धौम्यऋषींच्या आश्रमाकडे आले.याच ठिकाणी त्यांनी एक दिवस मुक्काम केला.अमृतवाहिनी प्रवरेच्या काठची जागा त्यांना मुक्कामासाठी आवडली.नंतर त्यांनी याच ठिकाणी अगस्ती ऋषच्या सांगण्यावरुन एक शिवलिंगाची स्थापना केली.स्वतःश्रीरामांनी या शिवलिंगाची स्थापना केल्यामुळे हे शिवलिंग आजही श्रीक्षेत्र रामेश्वर या नावाने ओळखले जाते.
अमृतवाहिनीच्या उत्तरेला परमपवित्र तिर्थस्थळ म्हणून हे देवस्थान ओळखले जाते.
दिवसेंदिवस या देवस्थानचा विस्तार महिमा वाढतच आहे.प्रभु श्रीरामांनी या पवित्र स्थळी पवित्र देवस्थानची स्थापना केली.प्रभुश्रीरामचंद्रांचे वास्तव्य या भागात घडून आले त्यामुळे ही पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते.
रामेश्वर देवस्थानची तिर्थ पर्यटनस्थळाकडे वाटचाल
रामेश्वर देवस्थान ट्रस्टची कायदेशीररित्या स्थापना करण्यात आली आहे.या ट्रस्टच्या माध्यमातून विविध विकास कामे परिसरात सुरु आहे.त्यामुळे रामेश्वर देवस्थानचा परिसर निसर्गरम्य व पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.थंडगार सावली देणारे वृक्ष,शोभीवंत झाडे,भाविकांना बसण्यासाठी मोठया प्रमाणात असलेली बाकडे,शिवशंकरांची भव्य अशी प्रांगणातील मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.मंदिराच्या शेजारी संथ वाहणारी प्रवरा नदी या मुळे परिसराची शोभा वाढली आहे.धार्मिक व तिर्थ पर्यटनस्थळ म्हणून मोठया प्रमाणात विकासाची संधी रामेश्वर देवस्थान व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने निर्माण झाली आहे.रामेश्वर देवस्थानचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे.त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे.महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजने अंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंदिरा सभोवताली संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्राप्त झाला आहे.सदरची भिंत बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.महाराष्ट्र शासन पर्यटन विकास योजने अंतर्गत मंदिराचे दाक्षिणात्य पध्दतीची सुधारणा,हेमाडपंथी पध्दतीचा सभामंडप,गोपुर प्रवेशद्वार,रस्ता काँक्रेटीकरण इ.कामे चालू आहेत.ग्रामीण तिर्थ विकास योजने अंतर्गत (ब वर्ग) ३ कोटी रुपयांच्या निधीतून सांस्कृतिक भवन,भक्तनिवास तसेच नदीच्या कडेला संरक्षण भिंत इ.कामे चालू आहेत.अशा प्रकारे धार्मिक व पौराणिक महत्व असलेले रामेश्वर देवस्थान तिर्थस्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.महाशिवरात्री महोत्सव निमित्त बुधवारी सायंकाळी ७ वा.दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्र महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त दररोज हजारो भाविकांना अन्नदानाची व्यवस्था रामेश्वर देवस्थान ट्रस्ट व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व समस्त ग्रामस्थ,धांदरफळ बुद्रुक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या माध्यमातून केली जाते.याचा पंचक्रोशीतील अनेक भाविक लाभ घेत आहेत.धांदरफळ व पंचक्रोशीत तसेच संगमनेर तालुक्यात प्रसिध्द असे रामेश्वर देवस्थानचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचे धांदरफळ बुद्रुक ग्रामस्थ व भाविक भक्तांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.