अहिल्यानगर: "केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या अटल टिंकरीग लॅब योजनेत आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचा समावेश होणार आहे," अशी माहिती कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी दिली.
" प्रामुख्याने ५ ते १० च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटल टिंकरींग लॅब योजनेत आतापर्यंत विज्ञान,अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व गणित या विषयांच्या प्रयोगशाळांचा समावेश होता.आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचे वाढते महत्त्व लक्षात घेता पंतप्रधान.नरेंद्र मोदी यांनी या विषयाकडे विशेष लक्ष दिले आहे.त्यामुळे आता आगामी काळात उभारण्यात येणाऱ्या अटल टिंकरींग लॅब मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचा समावेश करण्यात येणार आहे."असेही त्यांनी सांगितले.
"आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत असुन प्रत्येक क्षेत्रात त्याचा प्रभाव वाढत आहे.त्यामुळे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरविले आहे."
"सीबीएसई अथवा राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये ही योजना राबविता येणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडून पहिल्या वर्षी रु.१२ लक्ष व पुढील प्रत्येक वर्षी रु.२ लक्ष इतके अनुदान शाळांना दिले जाणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शाळांनी या योजनेच्या लाभ घ्यावा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून द्यावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुक शाळांनी ९४२२२२२६९५ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.