आज बाजारात जुनी मैत्रीण भेटली.खूप उद्विघ्न दिसत होती. चौकशी केल्यावर समजले की तिच्या वडिलांची तब्येत बरी नाही.त्यांना दवाखान्यात भरती केले आहे.चौकशी केल्यानंतर समजले ते खरोखर खुप धक्कादायक आणि मनाचा थरकाप उडविणारे होते.
१४ एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली होती.त्यांच्या गावातल्या मोठ्या चौकाच्या मागच्या बाजूच्या परिसरात मिरवणूक आल्यानंतर अनेक रहिवासी मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर जमले. तिचे वडीलही नातवाला खांद्यावर घेऊन मिरवणूक पाहण्यासाठी चौकात आले.
आजकाल प्रत्येक चौकात थांबून डीजेवर गाणी लावून नाचणे आणि धमकी दिल्याच्या आवाजात घोषणा देणे हा प्रत्येक मिरवणुकांचा अविभाज्य भाग बनला आहे.तसाच प्रकार सुरू झाला.चौक आल्यानंतर डीजेचा आवाज वाढवला गेला.तरुण मुले जोशात येऊन नाचू लागली. डीजेचा स्पीड आणि आवाज दोन्हीही वाढले.तिच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास आहे.
डीजेच्या अचानक मोठ्या झालेल्या आवाजाने त्यांच्या छातीचे ठोके वाढले.ते अस्वस्थ झाले आणि त्यांचे हात थरथर कापू लागले.वरून आग ओकणारा सूर्य,डीजेचा पराकोटीला पोहोचलेला आवाज आणि प्रचंड गर्दी यामुळे त्यांना गरगरू लागले.त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या लोकांना हाक मारण्याचा प्रयत्न केला पण त्या बेफाम दणक्यात त्यांचा आवाज कोणालाच ऐकू जाईना आणि घाबरल्यामुळे त्यांच्या तोंडूनही आवाज फुटेना.
अखेर ते हातातल्या बाळासकट खाली पडले.तरीही कुणी त्यांच्याकडे लक्ष देईना.सुदैवाने तिथून त्यांच्या भागात काम करणारी एक बाई जात होती. तिने बाबांना खाली पडलेले बघितले आणि ती धावत आली. बाळाला उचलले आणि लोकांना मदतीसाठी पुकारू लागली.पण नाचणारे युवक इतके रंगात आले होते की कोणीही तिच्याकडे लक्ष द्यायला तयार होईना.
ती ओरडू लागली आणि शिव्या देऊ लागली तेव्हा दोन-तीन जणांनी तिला मदत केली.पण काकांना तिथून दवाखान्यात न्यायचे कसे किंवा घरी पोहोचवायचे कसे कुणालाच काही समजेना.मिरवणूकधारी चौकातून पुढे सरकायला तयार नव्हते.मिरवणुकीमुळे रहदारी ठप्प झाली होती.
ती बाई नाचणाऱ्या मुलांमध्ये घुसून त्यांना धरून हलवू लागली. "बुढा पल्ला ना वं... गाने बंद करा जी...." "अवं मरीन ना माय ते बुढा...." असे करत ओरडू लागली.डीजेच्या धुंदीत नाचणाऱ्या कुणालाही तिच्या म्हणण्याचे गांभीर्य कळत नव्हते. अखेर बराच वेळानंतर मिरवणूक हलली.तोपर्यंत दुसऱ्या एका म्हाताऱ्याने बाबांना बसते करून धरले होते.पण त्यांचे डोळे उघडत नव्हते.
मिरवणूक पुढे गेल्यानंतर आणखी काही मिनिटांनी एक रिक्षा मिळाली.बाईने प्रसंगावधान राखून बाबांना घरी न नेता सरळ जवळच्या एका दवाखान्यात नेले.त्यांचा नातू घाबरून रडत होता.तिथून त्यांच्या घरी फोन केला.सणानिमित्त लेक घरी आली होती.उत्साहाने स्वयंपाक चालू होता.घडलेली घटना कळाल्यानंतर सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घरातल्या औषधांचा डबा घेऊन सगळे धावत दवाखान्यात आले.
डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पेशंटला कुलरसमोर झोपवले होते.त्यांना इमर्जन्सी गोळी देऊन शुद्धीवर आणले.बराच वेळ त्यांचे हार्टबीट काही केल्या कमी होत नव्हते.सण राहिला बाजूला आणि मिरवणूक पाहण्याच्या नादात हे संकट ओढवले होते.
तिने सांगितलेली घटना ऐकून माझ्या अंगावर काटा आला. बाबा खाली पडल्यानंतर नाचणाऱ्या एका तरुणाचा पाय त्यांच्या कोपरावर पडून तिथे हेयर फ्रॅक्चर झाले होते.अक्षरशः मरता मरता जीव वाचला होता.
आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत बौद्ध माणूस पडला म्हणून कोणी ओरडले नाही पण हाच एखादा हिंदू मनुष्य चेंगरला असता तर सगळीकडे संतापाची लाट उसळली असती.त्याविरुद्ध रामनवमीच्या मिरवणुकीत एखादा बौद्ध किंवा मुस्लिम मनुष्य असा पडला असता तर त्या-त्या धर्माच्या नेटकर्यांनी हलकल्लोळ माजवला असता.
बौद्धाच्या मिरवणुकीत बौद्ध मेला तरी चालेल.हिंदूंच्या मिरवणुकीत हिंदू चेंगरला तरी चालेल. मुस्लिमांच्या गर्दीत मुस्लिम तुडवला तरी चालेल फक्त दुसऱ्या जाती धर्माच्या मिरवणुकीत आपल्या जातीचा माणूस चेंगरता कामा नये. आपल्या मिरवणुकीत तो स्वकियांच्या लाथेखाली तुडवून मेला तरी चालेल.
संभाजी भगत यांची एक रचना आहे...
"नाही हुसेन मारला
नाही किसन मारला
बया माणूस मारला
बया माणूस मारला...."
लोकांना फक्त जात मेल्याचे दुःख आहे.माणूस मेल्याचे कुणालाच दुःख नाही.एक दुसऱ्यावर शिरजोरी करण्यासाठी त्यांना निमित्त हवे आहे.निमित्ताची एक काटकी वणवा पेटवायला पुरेशी आहे.
सुदैव म्हणून काकांचा जीव वाचला.ते तिथे मरून पडले तरी मिरवणुकीतल्या लोकांना काहीही घेणे देणे नव्हते.जिने त्यांचा जीव वाचवला ती तर त्यांच्या जातीची नाही.ती फक्त त्या कुटुंबाची तोंड ओळख होती. त्या भागातून जाताना ती त्यांना पाहते म्हणून ओळखते.
तंत्रज्ञानाने माणसाच्या नरड्याभोवती फास आवळला आहे त्या फासात नितीमत्तेचे नरडे करकचून फासाटले आहे. जाती-धर्माच्या नावाखाली नाच्यांची फौज तयार झाली आहे.गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, चौका-चौकात,बाजार-बुणग्यांचा धुमाकूळ माजला आहे. प्रत्येक धर्माला आपली ताकद दाखवायची आहे. दुसऱ्या धर्मापेक्षा जास्त मोठा आवाज काढायचा आहे.
आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनीतीच्या कानाखाली आवाज काढणारी कायदा आणि सुव्यवस्था मरण पावली आहे.
अमृता खंडेराव.