संगमनेर (प्नतिनिधी) तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या माध्यमातून निळवंडे डावा व उजवा कालव्याला रविवार पासून उन्हाळी आवर्तन सुटणार आहे.या आवर्तनाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी टंचाई आढावा बैठकीत महावितरण विरोधात आमदार अमोल खताळ यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयात आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली या बैठकीस अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात,उपअभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील, सुनील अहिरे
यांच्यासह संगमनेर तालुक्यातील वीज उपकेंद्राचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. निळवंडे धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला तीन-चार दिवसांत उन्हाळी आवर्तन सुटत आहे. त्या आवर्तनाच्या कालावधीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा
खंडित होणार नाही, याची सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विजेच्या रोहित्रावर अतिरिक्त भार येत असल्यामुळे विजेचे रोहित्र खराब होत आहेत. त्यामुळे अतिरिक्त भार असणाऱ्या विजेच्या रोहित्रावरील भार कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करा असे निर्देश आमदार खताळ यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. महावितरण कार्यालयात आलेल्या ग्राहकाला अधिकारी व कर्मचारी उद्धटपणाची वागणूक देतात. अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या कार्यालयात तक्रार घेऊन
आलेल्या प्रत्येक नागरिकांशी सौजन्याने बोला आणि त्यांची काय अडचण आहे ती समजून घ्या, असेही आ. खताळ यांनी यावेळी सांगितले. महावितरण कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांचे कार्यालय दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची ससेहोलपट होते.ती थांबविण्यासाठी कार्यकारी अभियंता,उपअभियंता यांचे कार्यालय एकाच छताखाली यावीत,यासाठी महावितरणच्या मोकळ्या जागेत कार्यालयाची इमारत करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवा, यासाठी मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करील, असा विश्वास आ. खताळ यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.
