आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सकारात्मक दखल
नवी दिल्ली – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण आणि अपघातप्रवण ठिकाणांबाबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण व अपघातप्रवण ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळावी, यासाठी चंदनापुरी येथील प्रमोद राहाणे रामभाऊ राहाणे व अंकुश राहाणे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे मागणी केली होती.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी लोणी येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची निवासस्थानी आले होते त्यावेळी आमदार खताळ यांनी पत्र देऊन पाठ पुरावा केला होता.त्यांच्या या मागणीला मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री गडकरी यांनी संबंधित विभागास त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात मंत्रालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात पुढील कामांसाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे:
आनंदवाडी ते जावळेवस्ती (CH 132/112 ते CH 134/100) या दरम्यान सर्व्हिस रोड पूर्ण करणे (LHS बाजू).
चंदनापुरी घाटाजवळ नवीन व्हेईकल अंडर पास (CH 132/500) उभारणे.
बॉक्स कल्व्हर्ट (CH 135/000) दोन्ही बाजूंनी अप्रोच रोडसाठी भूसंपादन करणे.
या कामांमुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढणार असून वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर आ.अमोल खताळ यांनी या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
या निर्णयामुळे आनंदवाडी ते जावळे वस्ती दरम्यान सर्व्हिस रोडचे काम,चंदनापुरी घाटाजवळ नवीन व्हेईकल अंडर पास तसेच बॉक्स कल्व्हर्टच्या अप्रोच रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
या संदर्भात आमदार खताळ यांनी सांगितले, "महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न माझ्या निदर्शनास आणून दिला होता. मी हा विषय केंद्रात मांडला.नितीन गडकरी यांनी तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश दिले.या कामांमुळे संपूर्ण मतदारसंघात रस्ते सुरळीत आणि सुरक्षित होणार आहेत."
या पावलामुळे स्थानिक नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर समाधान मिळणार आहे. महायुतीच्या संघटित प्रयत्नांमुळे तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या नेतृत्वामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे स्थानिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.