चणेगावचे कृषिभूषण डॉ.विठ्ठलदास आसावा यांच्या प्रयोगाने शेतकरी प्रभावित;स्वतःबनवलेल्या प्रकाश सापळे वापराने शेतकरी समाधानी
चणेगाव, प्नतिनिधी महाराष्ट्रात खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारी, भात, ऊस तर रब्बीच्या हंगामात गहू, हरभरा आदी पिके घेतली जातात. सध्याच्या वातावरणात बहुतांश पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने हुमणीच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पिकांची ३० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होत आहे. साखर कारखान्यांसारख्या सहकारी संस्था हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करीत असतानाच, संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण डॉ. विठ्ठलदास आसावा यांनी घरात उपलब्ध असलेल्या किमान साहित्यात, कमी खर्चात हुमणीच्या भुंगेऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रकाश सापळा तयार केला असून, त्यांच्या शेतात त्याचा प्रत्यक्ष वापर सुरु केला आहे. यांच्या या युक्तीचा अवलंब परिसरातील बहुसंख्य शेतकरी करीत आहेत.
डॉ.विठ्ठलदास आसावा आपल्या शेतात नेहमी प्रयोग करतात.कमी खर्चातील परीणामकारक प्रयोग राज्यातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरलेले आहेत.शेतातील कुठलाही काडी कचरा पालापाचोळा पेटवून न देता जमीनीत पुनर्वापर करतात.त्यांच्या मार्गदर्शनाने हजारो शेतकरी प्रेरीत होऊन आपल्या शेतात तंत्रज्ञान अवलंब करत आहेत.
हुमणी कीडनियंत्रणासाठी एखाद्या शेतक-याने नाही
तर परिसरातील सर्वांनी सामुहिक प्रयत्न करून कमी खर्चातील प्रकाश सापळे वापरल्यास अधिक परिणाम होऊन शेतकरी वर्गाचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. त्यासाठी या सोप्या युक्तीचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. विठ्ठलदास आसावा,शेतकरी, चणेगाव, ता. संगमनेर
वर्षाचे जीवनचक्र
शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या हुमणी किडीच्या अंडी, अळी, कोष व भुंगा अशा चार अवस्था आहेत. अंडी अवस्था १२-१७ दिवस, अळी अवस्था ७ते ९ महिने, कोषावस्था १४ ते २९ दिवस आणी भुंगा अवस्थेत ४७ ते ९७ दिवस अशाप्रकारे या किडीचे एक वर्षांचे जीवनचक्र असते. या दरम्यान भुंगेरा व अळी अवस्था पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. भुगेरा पिकांची कोवळी पाने तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था अत्यंत हानिकारक असल्यामुळे पूक वाळून जाते. किंबहुना जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पीक नष्ट होते.
वळवाच्या पावसानंतर विणीची हंगाम
वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सूर्यास्तानंतर बांधाशेजारच्या बाभूळ, कडुनिंब, चिंच, बोर आदी झाडांवर गोळा होतात. भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळी जमीनीतून वर मीलनासाठी बाहेर पडतात. मादी भुंगेरे अगोदर मातीबाहेर येतात. सूर्योदयापूर्वी ते परत जमिनीत जाऊन लपतात. हुमणीच्या भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणारे सौरऊर्जा व विजेवर कार्यान्वित होणारे प्रकाशसापळे बाजारात उपलब्ध आहेत. त्यासाठी साधारणतः दीड हजार रुपये मोजावे लागतात.
घरच्या घरी असे बनवा प्रकाशसापळे
डॉ. आसावा यांची पध्दत वापरून कोणीही कमी खर्चात प्रकाशसापळा तयार करु शकतो. यासाठी बॅटरी चलीत फवारणी पंप,१२ वॉटचा एलईडी बल्ब, होल्डर, रिकामी प्लॅस्टिक बरणी, निकामी चार्जरची प्लगपिनसह आवश्यकतेनुसार वायर, प्लास्टिक अथवा लोखंडी घमेले, खराब इंजिन ऑईल, कीटकनाशक व पाणी लागते. बरणीच्या झाकणाला आतून होल्डर बसवून मागील बाजूस दोन छिद्रांकून दोन्ही वायर बाहेर काढाव्यात. चार्जरच्या वायरला त्या जोडून घ्याव्यात. शेताजवळ टांगलेल्या या बल्बच्या खाली घमेल्यातील पाण्यात इंजिन ऑईल किंवा कीटकनाशके टाकून बॅटरी पंप सुरु करावा. सायंकाळी बाहेर पडलेले भुंगेरे या प्रकाशाकडे आकर्षित होऊन घमेल्यात पडून मृत होतात आणि हुमणी अळीचा नाश होतो