अहमदनगर दिपक कदम ख्रिश्चन धर्मगुरूंना ठार मारण्याची भाषा करणाऱ्या आ.पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन आक्रमक झाला असून नुकतेच जिल्ह्यातील सर्व ख्रिश्चन समुदाय येथे जमत त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली.
सांगलीचे ‘सुपारीबाज’ आमदार पडळकर यांनी केलेल्या चिथावणीखोर आणि हिंसक वक्तव्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर करत केलेल्या विधानामुळे धार्मिक सलोखा धोक्यात आला असून ख्रिश्चन समाजात तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर नुकतेच अहमदनगर येथील बिशप हाऊस,तारकपूर येथे विविध चर्चचे धर्मगुरू सामाजिक कार्यकर्ते,आणि ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना कारवाई बाबत मागणीपत्र दिले.यामध्ये पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.तसेच संविधानाचा अवमान केल्याने त्यांच्या आमदारकी रद्दची कारवाई व्हावी, अशी मागणी झाली.
बैठकीची सुरुवात रेव्ह.सतीश तोरणे यांच्या प्रार्थनेने झाली. ‘सैनिकांनो धैर्य धरा’ या गीताच्या गायनानंतर रेव्ह.विकास लोखंडे, रेव्ह.सनी मिसाळ यांनी प्रार्थना केली,तर बायबल वाचन रेव्ह. मिसाळ यांनी केले. प्रास्ताविकात रेव्ह.जे.आर.वाघमारे यांनी शांततेने आणि शिस्तीने आंदोलन करण्याचे आवाहन केले.निवेदनाचे वाचन रेव्ह.मार्टिन पारधे यांनी केले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा.भारतीय दंड संहिता व तत्सम कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल आमदारकी रद्द करावी.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रेव्ह.वाघमारे, रेव्ह. तोरणे, रेव्ह.मिसाळ, रेव्ह.पारधे, पास्टर जोसेफ वैरागर, सामाजिक कार्यकर्ते पप्पू बारसे,पत्रकार सोलोमन गायकवाड, प्रा.सॅम्युएल वाघमारे आदींसह अनेक चर्चमधील धर्मगुरू,महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले व जिल्हाध्यक्ष दीपक कदम व महाराष्ट्र ख्रिस्ती सेना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीणराजे शिंदे चंद्रकांत उजगरे महिलावर्ग आणि युवक सहभागी होते.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल,असे मौखिक व लेखी आश्वासन दिले. ही बाब राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप प्रभूच्या प्रार्थनेने झाला.रेव्ह.जे.आर.वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानत शांततेतून पण निर्धाराने लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.