३,५०,००० भाविकांनी घेतला वडापावचा आस्वाद.
पारनेर प्रतिनिधी २ ते ४ जुलै दरम्यान पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांसाठी खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा संघटनेच्या वतीने आयोजित विशेष महाप्रसाद उपक्रमास वारकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
तीन दिवसांत तब्बल ३,५०,००० भाविकांनी वडापाव,भजी, चहाचा आस्वाद घेतला. सुरूवातीला २ लाख भाविकांसाठी वडापाव, भजीपाव, चहा, बिस्किटे, केळी व पाणी बाटली यांचे नियोजन होते मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने केवळ तीन दिवसांत ३.५ लाख वडापाव, हजारो लिटर चहा व टनामध्ये फळे आणि पाण्याच्या बाटल्या भाविकांच्या सेवेत अर्पण करण्यात आल्या.
पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख वारक-यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशी ही संख्या अधिक वाढली. शेवटच्या दिवशी तर अनेक दिंड्या थांबून महाप्रसादासाठी रांगेत उभ्या होत्या.
परिते येथे उभारण्यात आलेल्या या सेवेच्या मंडपात फक्त नाश्ताच नाही तर आरोग्य सेवाही दिली जात होती.
विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय किंवा प्रचाराच्या गोंधळाविना ही सेवा पूर्ण भक्तिभवाने, शिस्तबध्द आणि आत्मीयतेने केली जात होती.आरोग्य तपासणी स्टॉलवर थकलेल्या वारकऱ्यांची प्राथमिक तपासणी, पायदुखीवर उपचार आणि औषधांचे वाटप करण्यात येत होते.
वडापाव भजीपाव स्टॉलवर चवदार पर्याय झणझणीत मिरचीसह उपलब्ध होता. सुंठ, विलायची मिश्रीत गरमागरम चहा वारकऱ्यांना सुखावणारा होता. तर फळे पाणी बाटलीबंद पाणी सोबत घेऊन जात प्रत्येक वारकरी या महाभोजन यज्ञाचे कौतुक करत होता.
वारकऱ्यांमध्ये पांडूरंग
वारीला येणारा वारकरी म्हणजे कष्टकरी शेतकरी.त्याच्या पायावर हात ठेवून सेवा केली तर पांडूरंग भेटतो. मंदिरात फुले वाहत असताना जर माणसातला देव न दिसला तर ती पूजा अपूर्णच राहते. इथे कोणी कार्यकर्ता नाही. सर्व माझे जीवाभावाचे भाऊ आहेत. मी स्वतः हाती झाडू घेतो, साफ सफाई करतो. इथे फोटोसाठी सेवा करत नाही, इथे घाम गळेपर्यंत काम करणारे हात असतात असे यावेळी अहमदनगर दक्षिणेचे खासदार नीलेश लंके म्हणाले.
