संगमनेर प्रतिनिधी संगमनेर परिसरात गोहत्या प्रकरणी कारवाईसाठी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा सौ.पायल आशिष ताजणे व सर्व शहर, तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले असून, या प्रकरणी भ्रष्ट पोलिस कर्मचारी व धमकी देणाऱ्या कसाया विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सौ. पायल ताजणे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने राज्यात गोहत्याबंदी लागू केल्यानंतरही संगमनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर गोहत्या सुरू असून, संगमनेर हे गोमांस विक्रीचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे.अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या विरोधात आंदोलने,मोर्चे व निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. काही तरुण सतत पोलिसांना गो - हत्येसंदर्भात माहिती देत असूनही,काही भ्रष्ट प्रवृत्तीचे पोलिस अधिकारी ही माहिती कसायां पर्यंत पोहचवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परिणामी संबंधित तरुणांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व त्यांच्यावर हल्लेही होतात.
या सर्व घटना गंभीर असून, याबाबत पोलिस दफ्तरी आधीही तक्रारी दाखल झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.अशा प्रकारची माहिती गुप्त ठेवून योग्य कारवाई करणे हे पोलिस प्रशासनाचे कर्तव्य आहे.मात्र, उलट काही अधिकारीच गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सौ. ताजणे व भाजपाचे सर्व पदाधिकारी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येईल व या प्रकरणाला संपूर्णपणे पोलिस प्रशासन जबाबदार राहील.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना देण्यात आली असून, गोहत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
