अहिल्यानगर प्रतिनिधी आळंदी देवाची पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या मध्यवर्ती शब्दगंध साहित्य संवाद कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मूळचे चिचोंडी पाटील ता. नगर येथील रहिवाशी आणि पुणे येथे बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले फकीरा पवार यांची निवड करण्यात आली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्यकारी मंडळ आणि साहित्य संवाद कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीने त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.कामानिमित्त मूळ गावी ते आले असता शब्दगंधच्या बैठकीत त्यांना विशेष निमंत्रित केले होते. यावेळी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चोभें,प्रा. डॉ.अनिल गर्जे,प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी, मकरंद घोडके, मारुती खडके,ॲड. लक्ष्मण हजारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साहित्य संवाद कार्यक्रम रविवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आला असून त्यासाठी आयोजित बैठकीत सर्वांनी फकीरा पवार यांच्याशी संवाद साधला.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सायकलवर विटा विकून आपल्या व्यावसायिक कारकीर्तीची सुरुवात करणारे फकीरा पवार यांनी आपला जीवनपट सर्वांसमोर उलगडला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेले असताना आईने काबाडकष्ट करून आपल्याला शिकवले, वाढवले. हे ते आवर्जून सांगतात.पुणे येथे बांधकाम क्षेत्रात मोठे विश्व त्यांनी उभा केले असून त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत. रयत शिक्षण संस्थेची इमारत उभारणी व चिचोंडी पाटील येथे पाच एकर जागेत मोठे अध्ययावत ग्रामीण रुग्णालय त्यांनी दान दिलेल्या जमिनीवर उभे राहिले आहे. त्यांचा हा जीवनपट तरुण वर्गासाठी प्रेरणादायी असून कष्ट, प्रामाणिकपणा आणि कर्तुत्वाच्या जोरावर माणूस उत्तुंग भरारी घेऊ शकतो, हे प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे.
"शब्दगंध चळवळीशी आपण आता जोडले गेलो असून या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात आपण सक्रिय सहभाग घेऊ."असे ते म्हणाले.
यावेळी बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र चोभे पाटील यांनी केले तर शेवटी प्रा. डॉ.अनिल गर्जे यांनी आभार मानले. या साहित्य संवाद कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातीलही नवोदित तसेच मान्यवर साहित्यिक सहभागी होणार आहेत.