लातूर प्नतिनिधी लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते.त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती.त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले.त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता गोदावरी खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लातूर शहर विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात केली.
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली,हे आपले भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,मा मुख्यमंत्री स्व. विलास देशमुख व स्व.गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत होती.आज जिल्हा परिषदेच्या आवारात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे.स्व. विलास देशमुख यांचाही पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात आहे. या दोन्ही मित्रांची स्मारके एकाच आवारात आहेत,हा अनोखा योगायोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे,ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,आमदार सर्वश्री विक्रम काळे, संभाजी पाटील-निलंगेकर,धनंजय मुंडे, संजय बनसोडे,अभिमन्यू पवार, रमेश कराड,संजय केणेकर,मा. राज्यमंत्री बसवराज पाटील, मा.आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, मा.आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती.
