नाशिक दिनकर गायकवाड मुले आणि मुलींमध्ये कुठलाही भेद नाही. लिंगभेद करणे कायद्याने गुन्हा आहे, याबाबत मनपाच्या आशा सेविकांकडून शहरात जनजागृती केली जात आहे.
छाया रेखाकन-ईश्वरी भागवत
महापालिकेत माता मृत्यू समितीच्या बैठकीत या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुलींच्या जन्मदराची आकडेवारी तपासण्यात आली. बेटी बचाओ, बेटी पढाओची अंमलबजावणी आणि नागरिकांमधील मुलींबाबतचा बदलत जाणारा दृष्टिकोन यामुळे समाजात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शहरात मागील तीन महिन्यांत मुलींचा जन्मदर ८९२ पर्यंत गेला आहे.
बैठकीत माता मृत्यूची एकूण सहा प्रकरणे समोर ठेवण्यात आली. मात्र ही प्रकरणे ग्रामीण भागातील असल्याचे सांगण्यात आले. शहरात गर्भलिंग निदानला चाप बसावा, याकरिता शहरातील तीनशे सोनोग्राफी केंद्रांची व ६०२
रुग्णालयांची तपासणी मनपाच्या आरोग्य विभागाने केली. महापालिकेच्या या उपक्रमामुळे मुलींच्या जन्मदरात सुधारणा दिसून येत असून पुढील काळात या मोहिमेला आणखी गती देण्याचा निर्धार आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली होती. त्याचा सकारात्मक परिणाम तीन महिन्यांत दिसून आला आहे. मागील वर्षी हजार मुलांमागे केवळ ८८९ मुलींचा जन्मदर नोंदवला गेला होता. मात्र मागील तीन महिन्यांत मुलींचा जन्मदर वाढून सरासरी ८९२ वर पोहोचला आहे. दोन लाख घरांमध्ये सातशे आशा कर्मचाऱ्यांकडून पालकांचे समुपदेशन केले. त्यातून मुलगा-मुलगी समानतेचा संदेश पोहोचल्याने मागील तीन महिन्यांत मुलींचा जन्मदर वाढल्याचा दावा मनपाने केला
