मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान येथे ऊर्जा तसेच विविध विकास योजनांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यातील २,४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे ई-लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण प्रकाशगड, वांद्रे येथून करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे ही काळाची गरज आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-संवादात सांगितले.
यावेळी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, राज्यातील 'पी.एम. कुसुम सी - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०' आणि 'पी.एम कुसुम सी. बी. - मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'चे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र. मोदी यांनी राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला.
