नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील
कनाशी आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थिनीचा आकडा वाढला असून कळवण उपजिल्हा रुग्णालयासह कनाशी,अभोणा येथे ५९ विद्यार्थीनी उपचारासाठी दाखल झाल्या आहे. या घटनेबाबत आदिवासी विकास मंत्र्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांनी लक्ष द्यावे,अशी मागणी पालकांनी केली आहे.
कनाशी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या आजारपणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शनिवारी कळवण उपजिल्हा रुग्णालयात तब्बल २८ विद्यार्थिनींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिवसेंदिवस आजारी विद्यार्थिनींचा आकडा वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापैकी सोमवारी विद्यार्थिनींना
डिस्चार्ज मिळाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंगाळ यांनी दिली आहे. दरम्यान रविवारी कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे १५, अभोणा ग्रामीण रुग्णालयात १६ तर कळ वण उपजिल्हा रुग्णालयात २८ अशा एकूण ५९ विद्यार्थीनी उपचारासाठी दाखल करण्यात आल्या आहेत. अजून संख्या वाढण्याची शक्यता असून पालक वर्गात दहशत निर्माण झाली आहे. अक्षरशः एक
रुग्णवाहिका कनाशी आश्रम शाळेत कायमस्वरूपी उभी असून सतत एक एक विद्यार्थीनी रुग्णालयात दाखल होत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या दौऱ्याापूर्वी अन्नाचे व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. प्राप्त अहवालानुसार पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत तसेच अन्नाच्या नमुन्यांचे अहवाल अजून प्राप्त व्हायचे आहेत.
आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या दौऱ्यादरम्यान खरी माहिती लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी कुजबूज पालकांमध्ये सुरु असून आजारी मुलींना दुसऱ्या खोलीत ठेऊन मंत्र्यांना भेटूच दिले नाही, अशी माहिती पालक व काही विद्यार्थीनी देत असून त्यांच्या म्हणण्यानुसार, सेंट्रल किचनच्या भोजनामुळे तसेच शाळेत मिळालेल्या चिक्की व बिस्कीटमुळे त्रास झाल्याचे समोर आले आहे. दररोज आजारी विद्यार्थिनींची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनावर पूर्णपणे अविश्वास निर्माण झाला आहे. आदिवासी विकास मंत्र्यांच्या दीच्या दरम्यान आश्रम शाळा प्रशासनाकडून खरी माहिती लपवण्यात आल्याने आता या प्रकरणी पारदर्शक चौकशी व कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
