नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील पालखेड विभागांतर्गत असलेले सर्व धरण व कालवे यांचे जलप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी लाभधारक शेतकरी व सर्व उपविभागीय व शाखा अभियंता यांनी घ्यावी,असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एस. भागवत यांनी केले आहे. छायाचित्र-अजित अशोक ब्राह्मणे
जलसंपदा विभागाच्या जलाशयात, धरणांमध्ये आजूबाजूच्या गावांतून मोठ्या संख्येने नागरिक गणपती विसर्जनासाठी येतात,गणपती विसर्जनामध्ये मूर्तीमुळे व निर्माल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत असते. जलाशयातील पाणी खोल असल्याने
व पाण्याचा अंदाज येत नसल्याने या धरणात जिवित हानी होण्याच्या बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तसेच लगतच्या भागात वायुप्रदुषण, ध्वनीप्रदुषण होत असल्याच्या तक्रारी लगतच्या ग्रामपंचायतीनी केल्या आहेत. जलाशयांचे, धरणांचे पाणी लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी वापरण्यात येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. धरणांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेस बाधा पोहोचू नये, याकरिता जलाशयामध्ये, धरणामध्ये गणेश विसर्जन करण्यात येवु नये, त्याऐवजी गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.एस.भागवत यांनी केले आहे.
