नवी दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क आशिया कपच्या फायनलमध्ये चौकार मारून भारताला विजय मिळवून देणाऱ्या रिंकू सिंगला दाऊदच्या गँगने धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, रिंकूकडून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एकाने खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे. अलीकडेच रिंकू सिंगने आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजयी चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला होता आणि तो एकाच क्षणात चर्चेचा विषय ठरला होता.
काँग्रेसचे मा.आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याला धमकीचे फोन येत होते. या फोनद्वारे त्याच्याकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे.
तपासात उघड झाले की, या आरोपीने भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग यांच्या कडूनही खंडणीची मागणी केली होती. या आरोपींची नावे मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नविद अशी असून,त्यांना वेस्ट इंडिजमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजने त्यांना भारताच्या ताब्यात दिले. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी पहिला संदेश पाठवला.त्या संदेशात त्याने लिहिले होते की,आशा आहे तुम्ही ठिक असाल. मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे आणि मला आनंद आहे की, तुम्ही केकेआर संघाकडून खेळत आहात. रिंकू सर,मला खात्री आहे की एक दिवस तुम्ही आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचाल. साहेब, एक विनंती आहे, जर तुम्ही थोडी आर्थिक मदत करू शकलात, तर अल्लाह तुम्हाला आणखी बरकत देईल, इंशाअल्लाह. या संदेशाला कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे नवीदने ९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी रिंकू सिंगला दुसरा संदेश पाठवला, मला ५ कोटी रुपये हवे आहेत.
