आजपासून अस्तगाव माथा येथे शिवमहापुराण कथेला आरंभ
झरेकाठी सोमनाथ डोळे शिवभक्ती मध्ये दृढ विश्वास आणि समर्पण भावना असेल तर,सुखाची झोळी भरण्यातील सर्व अडथळे आपोआप दुर होतील.शिवपुराण कथेतून जेवढा भक्तीचा रसभाव तुम्ही ग्रहण कराल तेवढी तुमची भक्ती तुम्हाला शिवापर्यंत घेवून जाईल असा संदेश पंडित प्रदिप कुमार मिश्रा यांनी शिवपुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांना दिला.
अस्तगाव माथा येथे भक्तीमय वातावरणात चार दिवसांच्या शिवपुराण कथेचा प्रारंभ लाखो भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेवाचा जयघोष करीत करण्यात आला. मंत्री राधाकृष्ण विखे आणि सौ.शालिनी विखे यांच्या हस्ते शिवपुजन करुन,शिवपुराण कथेचा प्रारंभ करण्यात आला.
पहिल्याच दिवशी भाविकांच्या उपस्थितीने गर्दीचा उच्चांक मोडल्याचे दिसून आले.कथेच्या निमित्ताने डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली सुयोग्य नियोजन झाल्यामुळे गर्दी असूनही भाविकांना कथेचा आस्वाद घेता आला. मा. मंत्री आण्णासाहेब म्हस्के , आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
पंडित प्रदिप मिश्रा यांनी साईबाबांच्या भूमिचा उल्लेख करुन,शिवपुराण कथा या भागामध्ये होणे या पाठीमागे सुध्दा एक मोठी पुण्याई आहे. शिवपुराण कथा ऐकण्यासाठी सुध्दा मनामध्ये भाव असावा लागतो.आणि कथेचे आयोजन करण्याचा भाव मनामध्ये येणे यामध्ये सुध्दा शिवाची आराधनाच दडलेली आहे.
विखे पाटील परिवाराला मिळालेली पुण्याई पाहाता कथेचे आयोजन करणे त्यांच्या मनामध्ये येणे यामध्ये शिवभक्ती मध्ये असलेला भाव आणि दृढ विश्वास याचे द्योतक असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले शिव आराधने मध्ये दया,करुणा असणे महत्वाचे आहे.शिवाच्या मंदिरात जावून आराधने मध्ये सातत्य राखणा-या भाविकांना आलेल्या अनुभवरुपी पत्रांचे प्रदिप मिश्रा यांनी वाचन करुन, कोणत्याही भक्तीमध्ये निर्मलभाव असावा लागतो. त्यातूनच भक्तीरुपी आनंद आत्मसाद करता येतो.
महादेवाच्या पिंडीवर होणा-या अभिषेकाचे जल प्राषण करुन, जगणा-या पाण्यामधील मधील माशाचे उदाहरण देवून पंडित मिश्रा महाराज म्हणाले की, महादेवाच्या पिंडीत होणारा जलाभिषेक हा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ठरतो असे त्यांनी भाविकांना सांगितले.
याप्रसंगी सर्वांचे स्वागत करताना मंत्री ना.राधाकृष्ण विखे .म्हणाले की,पंडित प्रदिपकुमार मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्याची मिळालेली संधी ही पुर्वाश्रमीची पुण्याईच आहे. सनातन संस्कृतीला साजेसा असा शिवपुराण सोहळा आजपासून सुरु होत आहे.सर्व भाविकांच्या पाठबळाने हा अध्यात्मिक सोहळा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
