नाशिक दिनकर गायकवाड आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात पर्यावरण प्रेमी आणि संघटना आक्रमक झाल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवन येथे पाहणी करून मोठी झाडे तोडली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
नाशिककरांची जी भावना ती आमचीच आहे. तपोवनातील वृक्षतोडी संदर्भातील काढलेले निविदा रद्द करण्याचे संकेत देत त्यांनी एकही झाड तोडणार नाही. निविदा चुकीचे वाटले तर रद्द करू.आम्ही झाडांच्या बदल्यात मोठी झाडे लावणार आहोत. तज्ज्ञांना घेऊनच सर्व काम होईल,असेही मंत्री महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मंत्री महाजन म्हणाले की, एकही मोठे झाड आम्ही तोडणार नाही. छोटी झाडे उचलून दुसरीकडे लावू. ७०० झाडे हलवली जातील, पण १५ हजार नवीन झाडे लावली जातील, ही सर्व झाडे देशी प्रजातीची असून राजमुद्रा येथून १५ फूट उंच झाडे मागवली जाणार आहेत. सीएसआर निधीतून उद्योगपतींच्या मदतीने हा उपक्रम राबवण्याचे नियोजन असून एका झाडामागे जवळपास १४०० रुपये खर्च येणार असल्याचेही त्यांनी म्हटले. कुंभनगरीतील जागा कोणाचीही हडपली जाणार नसून साधुग्राम हे तसेच राहणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
भाजपवर होणाऱ्या टीकेबाबत महाजन म्हणाले, राजकीय पोळी भाजणार असाल, तर तोंडघशी पडाल. आम्ही कुणाच्या घशात जागा घालणार नाही. आम्ही कोंडीत पकडले जाणार नाही. जलसंपदा विभागाला देशात पहिले पारितोषिक मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. दुष्काळी भागात मोठी कामे सुरू आहेत.
४५ हजार कोटींचे काम चालू आहे. फडणवीस यांचे व्हिजन मोठे आहे. १० पैकी १० मार्क द्यावेत. नाशिकमध्ये येत्या महिन्यात रिंगरोडच्या कामाला सुरुवात होईल, सर्व कामे सिंहस्थ कुंभापर्यंत पूर्ण केली जातील,
निधी कमी पडू देणार नाही. नाशिकचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे ते म्हणाले. सहा महिन्यांत पार्कचे उद्घाटन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मनसे किंवा इतर पक्षांच्या आंदोलनाबाबत महाजन म्हणाले, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ते काय करायचे ते त्यांचा निर्णय आहे.
