अहिल्यानगर -प्रतिनिधी अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर,आधार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेकडो दिव्यांग,विधवा,वयोवृध्द लाभार्थ्यांसह लाक्षणिक लोटांगण आंदोलन करण्यात आले.
यावेळी आधार संस्था संघटना अध्यक्ष लक्ष्मण खडके व प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा युवा अध्यक्ष ॲड. पांडुरंग औताडे आदींनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना समक्ष मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्याशी सदर मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी जिल्हाधिकारी आशिया यांनी सदरील मागण्यांबाबत तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी श्रीरामपूर येथे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करीत असलेले बाबासाहेब बागुल यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. दिव्यांगांवरील अन्यायाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे का प्रशासनाचा मागासलेपणा असल्याचे ते म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदनात प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजनेचे जानेवारी - फेब्रुवारी २०२५ पासूनचे थकीत मानधन मिळावे., माहे ऑक्टोबर २०२५ पासूनचे थकीत वाढीव मानधन मिळावे.,आधारकार्ड बायोमेट्रिक अथेंटीकेशन अपडेट होत नसलेल्या दिव्यांगांना सुयोग्य पद्धतीने मासिक मानधन मिळावे., संजय गांधी निराधार योजना व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे नोंद असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी.
आमदार खासदार यांच्या विकास निधीतून दिव्यांग निधी १००% खर्च करावा.,सर्व निराधार योजनेतील दिव्यांगांना सरसकट २५०० रुपये लागू करण्यात यावे, दिव्यांग लाभार्थ्यांना सज्ञान मुलांची अट रद्द करणा-या आदेशाची अंमलबजावणी करावी.,तसेच जिल्हा नियोजन बजेट मधून १% निधी दिव्यांगासाठी खर्च करावा., तालुका व जिल्हास्तरावरील दिव्यांग संबंधित सर्व समित्या स्थापन करून दिव्यांग सदस्याची नियुक्ती व्हावी.,सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील दिव्यांगांसाठीचा राखीव निधी तात्काळ वितरित करण्यात यावा.याप्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
