सोलापूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्यभरात एकमेकांविरोधात उभ्या असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट हे बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. छाया रेखांकन-प्रकाश कदम
भाजप विरोधात या चारही पक्षांनी मिळून महाआघाडी स्थापन केल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या महाआघाडीची अधिकृत घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे केली आहे. त्यांनी बार्शीत आज सायंकाळी होणाऱ्या निर्धार मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकर्ते आणि नागरिकांना केले आहे.
बार्शी तालुक्यातील राजकारण हे नेहमीच आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन प्रमुख नेत्यांभोवती फिरत आले आहे. पक्ष कोणताही असो, निवडणुकीचा सामना प्रामुख्याने या दोन गटांमध्येच रंगताना दिसतो. यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप असा थेट सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.नेतृत्वाखालील
राज्यभरात भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र
येताना दिसत असले, तरी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकाच व्यासपीठावर येणे ही बार्शीच्या राजकारणातील मोठी आणि अनपेक्षित घडामोड मानली जात आहे.
या राजकीय घडामोडीमुळे जिल्हा परिषद निवडणूक अधिकच चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आज होणाऱ्या निर्धारण मेळाव्यात महाआघाडीच्या रणनीतीसह उमेदवार निवड, प्रचाराची दिशा आणि भाजपविरोधातील पुढील राजकीय भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,खा. संजय राऊत यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्या विषयी माझ्याकडे माहिती आलेली नाही. शिंदे गटाविषयी आमच्या भावना तीव्र आहेत. माझ्याकडे त्यासंदर्भात माहिती नाही. बार्शीतील या घडामोडींची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी भाष्य करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावरून स्थानिक पातळीवरील ही आघाडी पक्षश्रेष्ठींच्या संमतीने झाली आहे की नेत्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
