मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे पालक मंत्र्यांचे आंदोलकांना आश्वासन
झरेकाठी सोमनाथ डोळे पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा सिन्नर, अकोले व संगमनेर मार्गेच जावा,या एकमुखी मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे विकास क्रांती सेना तसेच विविध संघटनांच्यावतीने नुकतेच दोन ते अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सौ.नीलम खताळ यांनी आंदोलनस्थळावरून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना फोन लावत मुख्यमंत्र्या समवेत बैठक घडवून आणण्याचे साकडे घातले.त्यावर लवकरच कृती समितीची बैठक घडून आणू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना भ्रमणध्वनीवरून दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ, भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले, सावंत यांच्यासह संगमनेर व अकोले तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी पुणे-नाशिक रेल्वेमार्ग सिन्नर,अकोले संगमनेर मार्गे गेला पाहिजे आणि देवठाण, संगमनेर व बोटा येथे रेल्वे स्थानक झाले पाहिजे या मागणीवर आम्ही सर्वजण ठाम आहोत. तसेच जोपर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर रेल्वे कृती समितीची बैठक होत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
वेळप्रसंगी तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ज्येष्ठ नेते कारभारी उगले, जालिंदर वाकचौरे,बाजीराव दराडे,महेश नवले,जनार्दन आहेर,चंद्रकांत घुले,अजय फटांगरे,जालिंदर गागरे, किशोर डोके, गणपत फुलवडे,ज्ञानदेव गडगे, गौरव डोंगरे व सुहास वाळुंज यांनी दिला.यावेळी या आंदोलनाची भूमिका विकास क्रांतीसेनेचे संतोष फापाळे भगवान काळे आणि पत्रकार सतीश फापाळे यांनी मांडली
-नीलम खताळ यांचा थेट पालकमंत्र्यांना फोन.
आमदार अमोल खताळ यांना रस्ता रोको आंदोलनासंदर्भात माहिती होती.परंतु ते अचानक मुंबई येथे गेले असल्यामुळे ते आंदोलनाला उपस्थित राहू शकले नाही असे आमदार खताळ यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांनी आंदोलकांना सांगितले आणि यानंतर आंदोलनस्थळावरून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत उपस्थित आंदोलकांच्या भावना त्यांना सांगितल्या. त्यानंतर मंत्री विखे यांनी महापालिका निवडणुका संपल्यानंतर लगेचच संगमनेर-अकोले रेल्वे कृती समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेऊ असे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांच्या ठोस आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले रस्ता रोको आंदोलन मागे घेतले
- रेल्वे कृती समिती आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी डॉ.अजित नवलेची पालकमंत्र्यांना गळ
भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना सांगितले, १ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होणार असल्याने २० तारखेच्या आत संगमनेर व अकोले तालुका रेल्वे कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणावी. तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे जाऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुणे–नाशिक रेल्वे मार्ग सिन्नर–अकोले–संगमनेरमार्गेच नेण्याबाबत निवेदन द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
