आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामशाखेचे अध्यक्ष दत्तराज मुन्तोडे यांनी भारतीय राज्यघटना लिहीत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या यावर प्रकाश टाकला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनविली. त्या घटनेप्रमाणे २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले.
सर्व देशातील लोकांचा समान दर्जा असला पाहिजे आणि स्वतः ची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी कमितीटील सभासदांबरोबर खूप चर्चा करून कलमे तयार केली. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा व्हावा, म्हणून घटनेत एक कलम घालणे त्यांनी सभासदांना पटवून दिले.
मागासलेल्या वर्गांना विशेषतः अस्पृश्य व वन्य जाती यांना घटनात्मक हक्क मिळणे हे जरूरी आहे आणि त्याबद्दलची देखील कलमे त्यांनी लिहून काढली. हजारो वर्षे दलित जातींचे शेकडो जीवनमरणांचे प्रश्न जे होते त्यांना देशाच्या राज्यघटनेत स्थान मिळवून देण्याचे अजरामर कार्य बाबासाहेबांनी केले.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास शकील शेख, सुधाकर मुन्तोडे, सुशील मुन्तोडे, बबन मुन्तोडे, हर्षल पवार, सुरज मुन्तोडे, रावसाहेब मुन्तोडे, आकाश मुन्तोडे, अर्जून मुन्तोडे, सिद्धार्थ मुन्तोडे, प्रसाद मुन्तोडे हे पदाधिकारी उपस्थित होते व यावेळी भारतीय राष्ट्रध्वजारोहण शाखा अध्यक्ष दत्तराज मुन्तोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सल्लागार जगदीश मुन्तोडे यांनी अभिवादन केले.सुत्रसंचलन बबन मुन्तोडे व आभार प्रदर्शन सुशील मुन्तोडे यांनी केले.
